वक्फ मालमत्तांच्या सुयोग्य वापराविषयी पुण्यात होणार राष्ट्रीय चर्चासत्र

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : देशातील मुस्लिम समुदायाच्या विकासाच्या अनुषंगाने वक्फ मालमत्तांचा सुयोग्य वापर कसा करता येईल, यावर विचारमंथन करण्यासाठी पुण्यात २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी एका राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. (National seminar on proper utilization of waqf properties to be held in Pune)

National seminar on proper utilization of waqf properties to be held in Pune

कॅम्प परिसरातील आझम कॅम्पस येथे होणाऱ्या या चर्चासत्रात देशभरातून विविध क्षेत्रातील तब्बल ४० तज्ज्ञ मान्यवर सहभागी होणार असून, ‘अंडरस्टँडिंग ट्रू नेचर अँड मॅनेजमेंट ऑफ ऑकाफ फॉर बेटर प्रोटेक्शन, परफॉरर्मन्स अँड डेव्हलपमेंट’ हा या चर्चासत्राचा प्रमुख विषय असणार आहे.

पुण्यातील वक्फ लायझन फोरम, महाराष्ट्र वक्फ लिबरेशन अँड प्रोटेक्शन टास्क फोर्स’ तर्फे दिल्ली येथील इन्स्टिट्युट ऑफ ऑब्जेक्टीव्ह स्टडीज आणि बेंगळूरू येथील इंडियन वक्फ फाऊंडेशन यांच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

भारत सरकारच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या वक्फ अॅसेट मॅनेजमेंट सिस्टम ऑफ इंडिया (वामसी) या ई-गव्हर्नन्स उपक्रमांर्गत घेण्यात आलेल्या नोंदीनुसार, देशातील विविध राज्यांमध्ये असणाऱ्या विविध वक्फ बोर्डांअंतर्गत ८.६ लाख स्थावर आणि १६,६७४ जंगम मालमत्तांची नोंदणी करण्यात आली आहे.

माजी मुख्य आयकर आयुक्त ए जे खान म्हणाले, व्यवस्थापन /सुप्रिटेंडन्स अशा सर्व स्तरांशी संबंधित असलेल्या समाज बांधवांनी या महत्त्वाच्या राष्ट्रीय मालमत्तेचे संरक्षण तसेच दारिद्र्य निर्मूलन, शिक्षण आणि आरोग्य सेवेसाठी विकास करण्यात मदत करण्याच्या दृष्टीने ‘रियल टाइम’ कामगिरी दाखवणे आवश्यक आहे. तसेच या मालमत्तांच्या माध्यमातून कर उत्पन्न आणि बेरोजगारी निर्मूलन होण्यासही हातभार लागेल.

वक्फ लायझन फोरम’चे संचालक मोहम्मद फरीद तुंगेकर म्हणाले, वक्फ मालमत्ता या समाजाच्या फायद्यासाठी आणि समाजाच्या मालकीच्या आहेत. त्यांच्या योग्य वापरासाठी समाजाचाही सक्रिय सहभाग आवश्यक आहे. मात्र आपला समाज सध्या निद्रितावस्थेत आहे, नागरिकांनी वक्फ कायद्याशी संबंधित कलम ३-(के) समजून घेतले, तरच ते वक्फ मालमत्ता विकसित करून आपल्या समाजाची सामाजिक-आर्थिक परिस्थिती बदलू शकतात.

महाराष्ट्र वक्फ लिबरेशन अँड प्रोटेक्शन टास्क फोर्स ‘ चे अध्यक्ष सलीम मुल्ला म्हणाले , या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट हे वक्फ मालमत्ता, जे की सामाजिक कल्याणाचे महत्त्वपूर्ण आणि अतिशय उपयुक्त साधन आहे, अशा राष्ट्रीय संपत्तीची देखरेख, वापर आणि या मालमत्तांशी निगडित विविध समस्यांचे निराकरण करणे हा आहे.

परिषदेत प्रख्यात वक्ते, वक्फ कार्यकर्ते, मुतवल्ली, वक्फ बोर्ड सदस्य, न्यायाधीश, वकील हे श्रोत्यांना संबोधित करतील. प्रशासकीय आणि न्यायिक स्तरावर प्रभावीपणे प्रकरणे हाताळण्यासाठी वार्षिक आणि पंचवार्षिक काळासाठी एक कार्यक्षम कृती योजना तयार केली जाईल. तसेच या योजनांच्या पाठपुराव्यासाठी परिषदेच्या शेवटी एक सर्वोच्च संस्था निवडली जाईल. राष्ट्राच्या विकासासाठी वक्फ’ची उद्दिष्टे साध्य करण्याच्या हेतूने सर्व भागधारकांशी सातत्यपूर्ण संवाद साधणे हा या परिषदेचा हेतू असणार आहे.