मोठी बातमी : अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ठरली महाराष्ट्रात अव्वल, 63178 जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणे निकाली, बार्टीच्या महासंचालकांकडून समितीच्या कामकाजाचे कौतूक !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने आपल्याकडे प्राप्त झालेल्या 71939 ऑनलाईन प्रकरणांपैकी 63178 प्रकरणे निकाली काढत जातवैधता प्रमाणपत्रांचे (Caste (Validity Certificate) वाटप केले आहे. राज्यात अश्याप्रकारे विक्रमी कामगिरी करणारी अहमदनगर जिल्हा समिती ही ऐकमेव ठरली आहे. त्यामुळेच राज्यातील सर्व समित्यांना मागे टाकत अहमदनगर ‍जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती (Ahmednagar District Caste Certificate Verification Committee) राज्यात अव्वल ठरली आहे.

Ahmednagar district caste certificate verification committee became the top in maharashtra state, 63178 caste validity certificate cases were resolved, committee's work was appreciated by director general of Barti,  ahmednagar news today,

अहमदनगर ‍जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. समितीने 112 प्रकरणे अवैध ठरवले आहेत. एकिकडे राज्यात सर्वाधिक प्रकरणे निर्गमित करण्याबरोबरच बनावटगिरीला चाप लावण्याचे काम करणारी अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती राज्यात एकमेव ठरली आहे. अहमदनगर ‍जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या या उल्लेखनीय कामकाजाबद्दल  डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)चे महासंचालक सुनिल वारे (Barti Director General Sunil Vare) यांनी समितीचे कौतूक केले आहे.

अहमदनगर ‍जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने जातवैधता प्रमाणपत्राच्या जलद वितरणासाठी विविध उपक्रम, विशेष मोहीमा वेळोवेळी राबविण्यात येत आहेत. समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय, सुयोग्य व्यवस्थापन, जलद निर्णय प्रक्रिया व तालुकास्तरावर घेतलेले शिबिरे या माध्यमातून समितीने जलद कामकाज केले आहे.

राज्यातील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितींच्या कामकाजावर सामाजिक न्याय विभागाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) या स्वायत्त संस्थेचे नियंत्रण आहे.बार्टीचे महासंचालक सुनिल वारे (Barti Director General Sunil Vare) यांनी अहमदनगर जिल्हा समितीला ८ जून २०२३ रोजी अभिनंदनपर पत्र पाठवून समितीच्या कामकाजाचे कौतूक केले आहे.समितीने राबविलेल्या उल्लेखनीय उपक्रमांची प्रशंसा केली आहे. यापुढील काळात ही समितीने कामात सातत्य, तत्परता व पारदर्शकता राखावी, राज्यात अव्वल क्रमांक टिकवण्याची परंपरा अबाधित ठेवावी. अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.

अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने सेवा पंधरवड्यानिमित्ताने राबविलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातूनजातवैधता पडताळणी प्रमाणपत्रांचे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन वाटप केले. जिल्ह्यातील १११ महाविद्यालयांमधील प्राचार्य व कर्मचाऱ्यांना जातवैधता प्रमाणपत्र पडताळणीच्या ऑनलाईन प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले. जातप्रमाणपत्र वाटप करतांना त्रुटी राहू नयेत म्हणून जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची ऑनलाईन वेबनार द्वारे कार्यशाळा घेण्यात आल्या.

जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज कसे भरावेत? त्यासोबत कोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे ? शाळा, महाविद्यालयांनी कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे? विद्यार्थ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव कशा प्रकारे सादर करावेत? ऑनलाइन अर्जांचा भरणा कसा करावा? त्यानंतर काय प्रक्रिया अंवलबिण्यात यावी. या विषयांवर साध्या व सोप्या भाषेत विद्यार्थी, पालक, प्राचार्य व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. राहाता, संगमनेर, नेवासा, श्रीगोंदा, पारनेर व कोपरगाव या याठिकाणी २ ते ३ तालुक्यांच्या समावेशासह कार्यशाळा घेण्यात आल्या. कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा व प्रमाणपत्र वितरणाचा लाभ जिल्ह्यातील १११ महाविद्यालयांमधील प्राचार्य, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी  घेतला.

जिल्हा समित्यांचे कामकाज ऑनलाईन झाले आहे. https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येतो. निवडणूक, सेवा व शैक्षणिक कारणास्तव जातपडताळणी समित्यांकडे अर्ज करता येतो. समाजकल्याण विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या या समित्यांकडे एससी, ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी या जातप्रवर्गासाठी अर्ज करता येतो. जात प्रमाणपत्राची सत्यता तपासण्यासाठी समितीला किमान पाच महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, ही प्रक्रिया ऑगस्ट २०२० पासून ऑनलाईन झाल्याने कामात तत्परता आली आहे. 

अहमदनगर जिल्हा जात पडताळणी समितीवर तीन सदस्यांचा समावेश आहे‌. सध्या अहमदनगर समितीत अध्यक्ष म्हणून अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) विकास मारूती पानसरे (Vikas Maruti Pansare), सदस्य तथा उपायुक्त अमीना शेख (Amina shaikh) व सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी भागवत खरे (Bhagwat khare) हे कामकाज पाहतात. याशिवाय समितीला क्षेत्रीय चौकशीकामी सहाय्य करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस शिपाई यांचा समावेश असलेले दक्षता पथक कार्यरत असते.

‘‘चुकीच्या माणसाला लाभ न दिला जाता योग्य लाभार्थ्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मंजूर झाला पाहिजे. यासाठी जात वैधता प्रमाणपत्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अहमदनगर समितीने आपल्या कामात तत्परता व पारदर्शकता आणली आहे. प्रत्यक्ष तालुकास्तरावर शिबिरे घेत लाभार्थी विद्यार्थी व नागरिकांना थेट प्रमाणपत्र वाटप केले आहे.’’ अशी प्रतिक्रिया समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) विकास मारूती पानसरे (Additional Collector (Selection Grade) Vikas Maruti Pansare) यांनी दिली आहे.