जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप्रणित शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 39 दिवसानंतर झाला खरा, पण मंत्रीपदाची संधी न मिळाल्याने भाजपातील खदखद आता बाहेर येऊ लागली आहे. भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी बोलून दाखवली आहे.

सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांना पक्षाकडून सातत्याने डावलले जात आहे. विधानपरिषद असो की राज्यसभा या ठिकाणी पंकजाताईंचे नाव चर्चेत होते पण त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. उलट स्व गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना पक्षाने राजकीय ताकद दिली. पक्षाकडून सातत्याने डावलले जात असल्याने पंकजाताईंनी अनेकदा आपल्या मनातील खदखद उघडपणे बोलून दाखवली आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला. त्यातही पंकजाताईंना डावलण्यात आले. यावरून माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली खदखद व्यक्त केली. मला मंत्रीपद देण्याइतकी माझी पात्रता नसेल, कदाचित अजून पात्रतेचे लोक असतील. त्यांना जेव्हा माझी तेवढी पात्रता वाटेल तेव्हा मंत्रीपद देतील असे म्हणत त्यांनी आपली नाराजी पुन्हा एकदा उघड केली.

पंकजा मुंडे यांनी आज राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना राखी बांधली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या मनातली खदखद व्यक्त केली आहे.

पंकजा मुंडेंना मंत्रीमंडळ विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याबद्दल विचारणा केली असता त्या म्हणाल्या की, मी मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मंत्रीमंडळ बनवायचं असतं, त्यात सगळ्यांना समाधानी करता येत नसतं. पण जे मंत्री झाले आहेत, त्यांनी तरी लोकांना समाधानी करावं. मला मंत्रीपद देण्याइतकी माझी पात्रता नसेल. अजून पात्रतेचे लोक असतील कदाचित. त्यांना जेव्हा माझी तेवढी पात्रता वाटेल तेव्हा देतील. त्याबद्दल मला काही आक्षेप नाही.
चर्चा माध्यमे किंवा कार्यकर्त्यांकडून होतात. आता माझे कार्यकर्ते आणि मी देखील शांत बसले आहे. त्यांना ज्यांची पात्रता आहे असं वाटेल, त्यांना ते मंत्रीपद देतील. त्यात माझी काही भूमिका असण्याचं कारण नाही. मी स्वाभिमानाने राजकारण करण्याचा प्रयत्न करते, अशा शब्दांत पंकजा मुंडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.