जामखेड तालुक्यातील 5000 हजार ऊसतोड कामगारांना मिळणार ओळखपत्र, अमृत पंधरवडा अभियानाचा जामखेड तालुक्यात शुभारंभ

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड हा अवर्षणप्रवण तालुका आहे. या तालुक्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर ऊसतोड मजुर स्थलांतर करतात. ऊसतोड कामगारांसाठी शासन ज्या योजना आखत आहे त्याचा कामगारांनी फायदा घ्यावा. त्यासाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी ऊसतोड कामगारांना ओळखपत्र द्यावे असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले.

राज्य शासनाच्या अमृत पंधरवडा अभियान व हर घर तिरंगा अभियानाचा शुभारंभ मोठ्या धुमधडाक्यात जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथून मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते झाला. यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, सरपंच विश्वनाथ राऊत, कार्यकारी अभियंता माने, तालुका आरोग्य अधिकारी सुनील बोराडे, CDPO बेल्हेकर मॅडम, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, विस्तार अधिकारी भजनावळे, ग्रामसेवक अनिल आटोळे तसेच पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

  • जामखेड तालुक्यात २५०० कुटुंबांना ध्वज देण्यात येणार
  • जामखेड तालुक्यातील विधवा व एकल महिलांची होणार नोंदणी
  • जामखेड तालुक्यातील 5 गावांमध्ये हर घर जलचे उद्दिष्ट
  • जामखेड तालुक्यातील ५००० हजार ऊसतोड कामगारांना मिळणार ओळखपत्र
  • जामखेड तालुक्याती १० अंगणवाड्या आणि ३० शाळांमध्ये उभारले जाणार जैविक वॉल कंपाउंड

३० शाळांमध्ये उभारले जाणार जैविक वॉल कंपाउंड

जामखेड तालुक्यामध्ये अमृत पंधरवडा अभियानांतर्गत १ ते १५ ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. तालुक्यातील ३० प्राथमिक शाळा व १० अंगणवाड्यांना जैविक वॉल कंपाउंड केले जाणार आहे. यामध्ये शाळा/अंगणवाडीच्या सभोवती झाडे लावून झाडांची वॉल कंपाउंड केले जाणार आहे.

जामखेड तालुक्यातील ५००० हजार ऊसतोड कामगारांना मिळणार ओळखपत्र

जामखेे तालुक्यातील प्रत्येक ऊसतोड कामगाराला १५ ऑगस्ट ओळखपत्र दिले जाणार आहे. या योजनेचा जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथून  मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला. फक्राबाद येेथे १५ ऊसतोड मजुरांना ओळखपत्र देण्यात आले.

१५ ऑगस्टपर्यंत जामखेड तालुक्यातील ५००० ऊसतोड कामगारांना ओळखपत्र दिले जाणार आहे. या ओळखपत्रांच्या माध्यमांतून त्यांना मुलांसाठी हॉस्टेल व इतर योजनांचा लाभ घेता येईल. सर्व मजुरांनी ग्रामपंचायतकडून ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले आहे.

जामखेड तालुक्यातील 5 गावांमध्ये हर घर जलचे उद्दिष्ट

जामखेड तालुक्यातील 5 गावांमध्ये 100 % कुटुंबाना वैयक्तिक नळ जोडणी देऊन हर घर जलचे उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे. त्याचबरोबर अंगणवाडी व शाळांचा भौतिक विकास केला जाणार आहे.

जामखेड तालुक्यातील विधवा व एकल महिलांची होणार नोंदणी

जामखेड तालुक्यातील सर्व विधवा व एकल महिलांची नोंदणी १५ ऑगस्ट पर्यंत केली जाणार आहे. या माध्यमांतून वंचित विधवा व एकल महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ देणे शक्य होणार आहे. तसेच सर्व शाळा व महाविद्यालयातील एकल विद्यार्थ्यांचीही नोंदणी केली जाणार आहे. आई किंवा वडील हयात नसतील किंवा संगोपन करत नसतील तर त्यांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात येईल.

जामखेड तालुक्यात २५०० कुटुंबांना ध्वज देण्यात येणार

६० वर्षाच्या वरील सर्व नागरिकांना covid चा बूस्टर डोस देणे, प्रधानमंत्री मातृवंदन योजनेचा तिसरा टप्पा सर्व लाभार्थ्यांना देणे या बाबीही १५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहिमेत २५०० कुटुंबांना ध्वज देण्यात येणार असून तालुक्यातील सर्व संस्था, घरे यावर ध्वज फडकवला जाणार आहे. यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ध्वज उपलब्ध केले असून २५ रु मध्ये नागरिकांनी ते खरेदी करावे असे आवाहन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले आहे.