… म्हणुन स्मशानभूमीत उपोषणाला बसली महिला, बीडमधील घटनेने उडाली खळबळ

बीड : बीड मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीडमधील पाली गावात एक महिला चक्क स्मशानभूमीत उपोषणाला बसली आहे. भूसंपादनाचा मोबदला मिळावा यासाठी पतीने वर्षभरापूर्वी जीव गमावला होता. आता पत्नी उपोषणाला बसली आहे. झोपलेल्या सरकारला या कुटूंबाला न्याय देण्यासाठी कधी वेळ मिळेल असा संतप्त सुर जनतेतून उमटत आहे. (Woman fasting at cemetery, incident in Beed)

भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी अनेक वेळा आंदोलनं, ऊपोषण आणि तक्रार देऊनही, न्याय न मिळाल्याने, बीडच्या ( Beed) पाली येथील अर्जुन साळुंके यांनी नोव्हेंबर 2020 ला बीडच्या पाटबंधारे कार्यालयाच्या दारातचं स्वतःला जाळून घेत आपलं जीवन संपवलं होतं. या घटनेला जवळपास आता एक वर्ष 3 महिने होत आले तरी, अद्यापही हा प्रश्न मार्गी लागला नाही.

यामुळं संतप्त झालेल्या अर्जुन साळुंके यांच्या पत्नीनं बीडच्या पाली गावातील स्मशानभूमीत बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. (Latest Beed News In Marathi)

बीड पासून जवळच असलेल्या पाली येथील, अर्जुन साळुंके यांच्या आजोबांची गावातील सर्वे नंबर 10 मधील जमीन, पाटबंधारे विभागाने संपादित केली होती. या जमिनीवर प्रशासनाचे सर्व कामकाजही सुरू झाले.

परंतु त्याचा मावेजा साळुंके यांना मिळाला नाही. यामुळे साळुंके यांनी अगोदर जिल्हा प्रशासन आणि नंतर मंत्रालयापर्यंत धाव घेतली. परंतु प्रश्न मार्गी न लागल्यामुळे शेवटी 24 नोव्हेंबर 2020 रोजी बीड शहरातील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाच्या दारातचं त्यांनी स्वता:ला जाळून घेत आपलं जीवन संपवलं.

याप्रकरणी पाठबंधारे भूसंपादन आणि भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांवर गुन्हे देखील दाखल झाले. मात्र त्यानंतर तरी साळुंखे कुटुंबाला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु अद्यापही त्यांना न्याय मिळाला नाही.

प्रशासनाचा बळी ठरूनही न्याय न मिळाल्याने, आत्मदहन केलेल्या अर्जुन साळुंके यांच्या पत्नीवर देखील न्यायासाठी आर्त हाक देण्याची वेळ आली आहे.दरम्यान संबंधित अधिकारी गुन्हे मागे घ्या म्हणून माझ्यावर दबाव टाकत आहेत. असा आरोप पीडिता तारामती साळुंके यांनी केला आहे.

त्यामुळे तीनही विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करावी आणि आम्हाला न्याय द्यावा. अशी आर्त हाक तारामती साळुंके यांनी दिली आहे. त्यामुळं सामाजिक न्यायमंत्र्यांच्या जिल्ह्यात स्मशानभूमीत उपोषण करण्याची वेळ आलेल्या तारामती साळुंके यांना न्याय मिळणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.