पावसाळी अधिवेशन 2023 : जामखेडमधील नऊ वर्षीय मुलीच्या मृत्यूचे विधानपरिषदेत पडसाद, वीजप्रश्नी आ. राम शिंदे यांनी उपस्थित केले तीन महत्वाचे तारांकित प्रश्न !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शेतशिवारांमध्ये लोंबकळणाऱ्या तारांचा मुद्दा, पिंपरी चिंचवड येथील रोहित्राचा स्फोटातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत मिळणे व मुख्य वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने जामखेड मधील नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू या तीन महत्वाच्या मुद्द्यांकडे आमदार प्रा राम शिंदे यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमांतून सरकारचे लक्ष वेधले. पावसाळी अधिवेशनात आमदार प्रा.राम शिंदे व इतर आमदारांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर देत खुलासा केला आहे.

Monsoon Session 2023, Death of nine-year-old girl in Jamkhed reflected in Legislative Council, Electricity question mla Ram Shinde raised three important starred questions, latest marathi news,

जामखेड शहरातील जुन्या डी. जे. हॉटेलच्या पाठीमागील भागातील एका घरावरून गेलेल्या मुख्य वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना मे २०२३ च्या चौथ्या आठवड्यात घडली होती. या घटनेवरून आमदार प्रा राम शिंदे यांनी सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला.

जामखेडमध्ये मुख्य वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना खरी आहे काय? असल्यास,अरुंद असलेल्या रस्त्यावरून गेलेली मुख्य वीज वाहिनी शहराबाहेरून घेण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांनी करूनही अद्याप कारवाई न केल्याने अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता आहे, हेही खरे आहे काय ? असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने विजेच्या धक्क्याने मृत्यूमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबियाना तातडीने मदत देण्याबाबत तसेच अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी वीज वाहिन्या इतरत्र हलविण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ? नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ? असा तारांकित प्रश्न आमदार प्रा राम शिंदे यांनी उपस्थित केला होता.

आमदार प्रा राम शिंदे यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांवर उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, सदर घटना खरी असून जामखेड शहरातील मुख्य वीज वाहिनी इतरत्र हलविण्याबाबत जामखेड उप विभागात नागरिकांनी निवेदन सादर केले आहे. मयत मुलीच्या कुटुबियांना महावितरणातर्फे तातडीची मदत म्हणून 20 हजार रुपये देण्याकरीता महावितरणचे कर्मचारी गेले असता त्यांनी सदर रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. ११ के. व्ही. वीज वाहिनीमुळे अपघात टाळण्याकरीता तातडीची उपाययोजना म्हणून सद्य:स्थितीत जामखेड शहरातील अरुंद रस्त्यालगत असलेल्या ११ के. व्ही. वीज वाहिनीकरीता कोटेड कंडक्टरची व्यवस्था करण्यात आली असून सदर काम २ ते ३ दिवसात पूर्ण करण्यात येईल. असे म्हटले आहे.

राज्यातील शेतशिवारांमध्ये लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारा व डीपीच्या दुरुस्तीची कामे सुरक्षिततेच्या दृष्टीने पावसाळ्यापूर्वी करणेबाबत आमदार प्रा. राम शिंदे, आमदार रमेशदादा पाटील, आमदार उमा खापरे, आमदार प्रविण दरेकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रसाद लाड, आमदार रामदास आंबटकर,आमदार निलय नाईक, ॲड निरंजन डावखरे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करत खालील गोष्टींचा खुलासा सरकारला मागितला होता.

(१) राज्यातील शेतशिवारांमध्ये ६० वर्षांपूर्वीच्या लोंबकळणाऱ्या वीज वाहक जीर्ण तारांचा प्रश्न ऐरणीवर असताना कृषी पंपाच्या वीजपुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू असल्याची बाब माहे मे, २०२३ च्या तिसऱ्या आठवड्यात वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर लोंबकळणाऱ्या तारांमुळे शॉर्ट सर्किट होऊन शेतमालाचे जळून नुकसान होण्याच्या घटनेत वाढ होत असल्याने लोंबकळणाऱ्या तारांवर आलेले वृक्ष तोडणे, शेतशिवारातील उघड्या डीपी फ्युज झाकणे, वाकलेले खांब सरळ करणे इ. कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी करण्यासाठी शासनाने कोणत्या उपाययोजना केल्या वा करण्यात येत आहेत, (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) ग्राहकांना उच्च दर्जाची सुविधा उपलब्ध करण्यासाठी महावितरणच्या धोरणानुसार राज्यात महावितरणच्या क्षेत्रामध्ये प्रतिबंधात्मक देखभाल व दुरुस्ती आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्स अंतर्गत प्रत्येक स्तरावर महावितरणच्या सुचिबध्द कंत्राटदाराकडून विद्युत तारा बदलणे, झोळ आलेल्या विद्युत तारा ओढणे, जंपर बदलणे, पोल बदलणे, झाडाच्या फांद्या तोडणे, स्टेला व्यवस्थित ताणे बसविणे, रोड क्रॉस गाळयाला गार्डींग व्यवस्थित करणे, डीस्ट्रीब्यूशन बॉक्स दुरुस्ती करणे इ. कामे पावसाळा सुरु होण्यापूर्वी करण्यात येतात. त्यामुळे संभाव्य ब्रेकडाऊन किंवा वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याचे तसेच अपघात होण्याचे प्रमाण कमी झाले.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पिंपरी चिंचवड (जि. पुणे) परिसरातील भोसरी, इंद्रायणी नगर भागात रोहित्राचा स्फोट होऊन मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना भरपाई मिळणेबाबत (१८) १९५०५ श्रीमती उमा खापरे, श्री. प्रसाद लाड, श्री. रमेशदादा पाटील, श्री. रामदास आंबटकर, अॅड. निरंजन डावखरे, प्रा. राम शिंदे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करत खालील प्रश्नांचा खुलासा सरकारकडे मागितला होता.

(१) भोसरी, इंद्रायणी नगर (पिंपरी चिंचवड, जि. पुणे) भागात रोहित्राचा स्फोट होऊन मृत्यूमुखी पडलेल्या तिघांच्या वारसांना महावितरण आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी संयुक्तरित्या दहा लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने नुकतेच दिले असल्याची बाब माहे मे, २०२३ च्या तिसऱ्या आठवड्यात वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने या अपघाताला दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश आयोगाने दिले असून त्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

(२) मृत्यूमुखी पडलेल्या तिघांच्या वारसांना, महावितरणच्या नियमानुसार प्रत्येकी रुपये ४ लाख याप्रमाणे एकूण रुपये १२,००,०००/- दिनांक १२/१०/२०२० रोजी देण्यात आले आहेत. उर्वरित रकमेबाबतची कार्यवाही प्रक्रियाधिन आहे. महावितरणने अपघातास दोषी असणाऱ्या अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी करुन, चौकशीच्या अनुषंगाने ५ अधिकारी व २ कर्मचारी यांचेवर कंपनीच्या नियमाप्रमाणे आरोपपत्र दाखल करुन व त्यांची चौकशी करुन, दोषी असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुध्द महावितरण कंपनीच्या नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. (३) प्रश्न उद्भवत नाही.