जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्याच्या राजकारणातील महत्वाच्या रत्नापुर, राजुरी आणि शिऊर या तीन ग्रामपंचायतींसाठी आज मतदान पार पडत आहे. दुपारपर्यंत 47 टक्क्यांच्या आसपास तीनही ग्रामपंचायतीमध्ये मतदान झाले आहे. सर्व ठिकाणी शांततेत मतदान सुरु आहे.

जामखेड तालुक्यातील शिऊर, राजुरी आणि रत्नापुर ग्रामपंचायत निवडणुकीत यंदा थेट जनतेतून सरपंचपदाची निवडणूक होत आहे. सरपंचपदासाठी राजुरीत तिरंगी, रत्नापूरात चौरंगी तर शिऊरमध्ये तिरंगी लढत रंगली आहे. तीन्ही गावांमध्ये चुरशीच्या वातावरणात मतदान होत आहे.

जामखेड तालुक्यातील 3 ग्रामपंचायतमधील 27 सदस्यपदांच्या जागांसाठी 55 उमेदवारांच्या आणि सरपंचपदाच्या 3 जागांसाठी दहा उमेदवारांच्या भवितव्याचाआज फैसला होणार आहे. सकाळ पासूनच मतदारांनी मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

दुपारी चार नंतर मतदारांचा प्रतिसाद वाढणार आहे. त्यामुळे तीनही ग्रामपंचायतीत 80 टक्क्यांच्या आसपास मतदान होण्याचा अंदाज आहे. तीनही ग्रामपंचायतीत भाजप विरूध्द राष्ट्रवादी असा सामना आहे. या निवडणुकीचा निकाल काय लागणार याची जामखेड तालुक्याला उत्सुकता आहे.
दरम्यान दुपारी दीड वाजेपर्यंत राजुरीत 40. 95 टक्के तर रत्नापूरात 49.86 टक्के तसेच शिऊरमध्ये 49.16 टक्के मतदान झाले आहे. तीनही ग्रामपंचायतीत एकुण 46. 80 टक्के मतदान पार पडले आहे.