जामखेड : ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन चोंडीतील उपोषणकर्त्यांशी आज रात्री साधणार संवाद !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेच्या वतीने जामखेड तालुक्यातील चोंडी येथे आमरण उपोषणाचे अंदोलन सुरु आहे. या अंदोलनाचा आजचा अकरावा दिवस आहे. चोंडीत सुरु असलेले उपोषण व धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नांवर आमदार प्रा.राम शिंदे यांनी सरकारचे लक्ष वेधल्यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे तातडीने चोंडीतील उपोषणकर्त्यांच्या भेटीसाठी छत्रपती संभाजीनगर येथून चोंडीच्या दिशेने रवाना झाले आहेत.त्यांच्या समवेत आमदार प्रा राम शिंदे हेही आहेत. आज रात्री आठ वाजता मंत्री महाजन हे सरकारच्या वतीने उपोषणकर्त्यांची भेट घेणार आहेत. याबाबतचा अधिकृत शासकीय दौरा प्रशासनाने जाहीर केला आहे.

Jamkhed, Rural Development Minister Girish Mahajan will interact with hunger strikers in Chondi tonight

17 ते 22 सप्टेंबर 2023 या काळात होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसुचीत जमातीत (एस.टी. प्रवर्ग) समावेश करून आरक्षणासाठीचा वटहुकुम काढावा या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या श्रीक्षेत्र चोंडी येथे गेल्या 11 दिवसांपासून आमरण उपोषणाचे अंदोलन सुरु आहे. बाळासाहेब दोडतले, माणिकराव दांगडे, अण्णासाहेब रूपनवर व सुरेश बंडगर, प्रदेश महासचिव नितिन धायगुडे, प्रदेश उपाध्यक्ष समाधान पाटील, राष्ट्रीय सल्लागार गोविंद नरवटे, अक्षय शिंदे सह इतर आमरण उपोषण करत आहेत.यातील एका उपोषणकर्त्याची प्रकृती ढासळल्याने त्यांना शुक्रवारी मध्यरात्री तातडीने वैद्यकीय उपचारासाठी अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसुचीत जमाती (एस.टी. प्रवर्ग) आरक्षणासाठीचा वटहुकुम काढावा या मागणीसाठी श्रीक्षेत्र चोंडी  येथे सुरु असलेल्या आमरण उपोषणाची सरकारने तातडीने दखल घ्यावी यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संभाजीनगर येथे भेट घेतली. शिंदे यांनी धनगर समाजाच्या प्रश्नांबाबत तसेच उपोषणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत सरकारचे लक्ष वेधले. त्यानंतर सरकार पातळीवर जोरदार हालचाली सुरु झाल्या. चोंडी येथील उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत असल्याने महाराष्ट्रातील धनगर समाजात रोष वाढत असल्याचेही त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले.

Jamkhed, Rural Development Minister Girish Mahajan will interact with hunger strikers in Chondi tonight

चोंडी येथे सुरु असलेल्या उपोषणाचं आणि धनगर समाजाच्या प्रश्नांचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने तातडीने सकारात्मक पाऊल उचलावीत म्हणून आमदार प्रा राम शिंदे यांनी सरकारकडे आग्रह धरला. यावेळी सरकारने उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची नेमणूक करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे आमदार प्रा.राम शिंदे यांच्या समवेत तातडीने चोंडीच्या दिशेने रवाना झाले. मंत्री महाजन तातडीने चोंडी दौर्‍यावर येणार असल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. प्रशासनाने मंत्री महाजन यांचा अधिकृत शासकीय दौरा घोषित केला आहे.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे आज रात्री आठ वाजता चोंडी येथील उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. महाजन यांच्या दौर्‍याकडे महाराष्ट्रातील धनगर बांधवांचे लक्ष लागले आहे. चोंडी येथील उपोषणकर्त्यांची भेट घेऊन मंत्री महाजन काय तोडगा काढणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सरकारचे सकारात्मक पाऊल

सरकार कोणतंही असो, पक्ष कोणताही असो, धनगर समाज सातत्यानं संयमाची शांततेची भूमिका घेऊन लोकशाही पध्दतीनं उपोषण करणं असेल, अंदोलन करणं असेल ही भूमिका पार पाडत आलेला आहे. गेल्या दहा दिवसांपासून चोंडीत उपोषण सुरू आहे. आमच्या प्रश्नाकडे शासन आणि प्रशासन लक्ष देत नाही ही धनगर समाजाची भावना झाली आहे. परंतू असं न होता, राज्य सरकारने तातडीने लक्ष दिलं पाहिजे, या दृष्टिकोनातून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची छत्रपती संभाजीनगर येथु भेट घेतली. चोंडी येथे सुरु असलेल्या उपोषणाचं आणि धनगर समाजाच्या प्रश्नांचं गांभीर्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले. सरकारने सकारात्मक पाऊल उचलले आहे.ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन हे आज रात्री उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत, अशी माहिती आमदार प्रा.राम शिंदे यांनी दिली आहे.

आमदार प्रा.राम शिंदे यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश – बाळासाहेब दोडतले

दरम्यान, चोंडी येथे अंदोलन करत असलेले माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोलतडे यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आमदार प्रा.राम शिंदे हे आमच्या भेटीसाठी चार वेळा आले. त्यांनी इथली व्यथा आणि सत्य परिस्थिती, वस्तुनिष्ठ परिस्थिती त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या समोर ठेवली. त्यानंतर झोपलेल्या सरकारला थोडीफार का होईना जाग आली. आणि  आमच्याशी चर्चा करण्यासाठी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची निवड सरकारने केली.उपोषण सुटावं, धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटावा, तो मार्गी लावावा, आरक्षणाची अंमलबजावणी करावी याच्यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी जो प्रामाणिक प्रयत्न केला आहे त्याबद्दल मी महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधव व यशवंत सेनेच्या वतीने त्यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.