gatvikas adhikari prakash pol | राज्यसरकारने स्थापन केलेल्या 14 सदस्यीय समितीत गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांचा समावेश !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । राज्याचे ग्रामीण गृहनिर्माण धोरण विकसित करण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमांतून ग्रामीण भागाचे नवे विकासाचे धोरण निश्चित केले जाणार आहे. सरकारने स्थापन केलेल्या 14 सदस्यीय समितीत जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ (Gatvikas Adhikari Prakash Pol) यांचा समावेश करण्यात आला आहे. (Group Development Officer Prakash Pol is included in 14-member committee set up by Maharashtra government.)

आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत राज्याचे ग्रामीण गृहनिर्माण धोरण विकसित करण्यासाठी राज्य शासनाने ग्रामीण भागातील जागेचा विकास करताना नियोजन करण्याकरिता धोरण निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. समितीत ग्रामसेवकांपासून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. स्मित समावेश झालेले सर्व अधिकारी हे प्रशासकीय पातळीवर नावाजलेले अधिकारी आहेत. अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेल्या अधिकाऱ्यांचा समितीत समावेश असल्याने ग्रामीण भागाच्या विकासाचे प्रभावशाली धोरण राज्याला समितीच्या माध्यमांतून मिळेल असे आता बोलले जात आहे.

शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे की, राज्यातील ग्रामीण भागात गावठाण, गायरान, शासकीय व खाजगी मालकीच्या जमिनी उपलब्ध आहेत. राज्यात ग्रामीण भागाचे मोठया प्रमाणावर नागरीकरण होत आहे. त्याचप्रमाणे राज्यातील मोठ्या शहरांशेजारी गावांमध्ये औदयोगिकरण होत आहे. त्यामुळे राज्यात ग्रामीण भागामध्ये विकासासाठी तसेच निवाऱ्यासाठी मर्यादित जागा उपलब्ध आहेत.

गावातील जागेची उपलब्धतता व उपयोग विचारात घेतांना ग्राम पातळीवर जागेच्या नियोजनाकरिता कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे उपलब्ध जागेचा विकास योग्य प्रकारे होत नाही. ही बाब विचारात घेता गावातील नागरिकांना सामायिक सुविधा उपलब्ध करुन देण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

राज्य शासनाने “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ग्राम विकासाचे विविध उपक्रम राज्यात राबविण्याबाबत निर्णय घेतला आहे. त्यामध्ये राज्याचे ग्रामीण गृहनिर्माण धोरण विकसित करणे हा उपक्रम अंतर्भुत आहे. सद्यस्थितीत ग्रामीण भागातील जागेचा विकास करताना शहरी भागासाठी अस्तित्वात असलेल्या नगररचना सारखी यंत्रणा उपलब्ध नाही.

राज्यातील ग्रामीण भागातील जागेचा विकास करताना जागेचे नियोजन करण्याकरिता धोरण निश्चित करणे आवश्यक आहे. या प्रकरणी ग्रामीण भागातील सध्याची वस्तुस्थिती तसेच यामध्ये सुधारणा करण्यासाठी राज्यातील शहरी भागातील नगर रचना व्यवस्था तसेच देशातील इतर राज्यातील परिस्थिती विचारात घेणे आवश्यक आहे. या संदर्भात वस्तुस्थिती दर्शक शिफारशीसह अहवाल सादर करण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

तीन महिन्यात समिती सरकारला अहवाल सादर करणार

समितीचे कामकाजासाठी आवश्यकतेनुसार विभागीय / जिल्हास्तरावरील माहितीगार व तज्ञ अधिकारी यांना बैठकीस आमंत्रित करता येईल. प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने सदर समितीस आवश्यकतेनुसार क्षेत्रिय भेटींचे नियोजन करता येईल. सदर समिती अभ्यास करुन तीन महिन्यांच्या मुदतीमध्ये शासनास अहवाल सादर करावा लागणार आहे.

14 सदस्यीय राज्यस्तरीय समिती खालीलप्रमाणे

१) डॉ. राजाराम दिघे, संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण, बेलापूर
२) राजेंद्र क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर
३) श्रीकांत लोंढे, उपसचिव, पंचायत राज, बांधकाम भवन, मुंबई
४) आर. एम. पवार, उपसंचालक, नगर रचना, पुणे
५) तुषार माळी, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पालघर
६) रविंद्र परदेशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जि.प. नाशिक
७)ओमप्रकाश यादव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जि.प.परभणी


८) नंदकुमार वाळेकर, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, चाळीसगांव जि.जळगांव
९) प्रकाश पोळ, गट विकास अधिकारी, पंचायत समिती जामखेड, जि. अहमदनगर
१०) संदीप दिक्षित, विस्तार अधिकारी (पंचायत), जि. प. सातारा
११) महादेव शिंदे, विस्तार अधिकारी (पंचायत), पंचायत समिती खालापूर, जि. रायगड
१२) दौलत गांगुर्डे, ग्राम विकास अधिकारी, ग्राम पंचायत पिंप्री सय्यद, ता. जि. नाशिक
१३) महेंद्र धाकपाडे, ग्रामसेवक, ग्राम पंचायत आमला निमला, ता.धारुर जि.बीड
१४) नीलेश काळे, उपसंचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण

कोण आहेत प्रकाश पोळ ?

प्रकाश पोळ हे जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आहेत. त्यांनी आजवर राज्यातील अनेक भागात काम केले आहे. पथदर्शी प्रकल्प राबवण्याबाबत पोळ हे प्रशासकीय वर्तुळात ओळखले जातात. अतिशय अभ्यासू असलेले पोळ हे नेहमी जनहिताचा विचार करून योजनांची अंमलबजावणी करतात. वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवण्यात ते नेहमी अघाडीवर असतात.

पोळ यांच्या निवडीचा जामखेडमध्ये आनंदोत्सव

गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांची राज्यस्तरीय समितीत निवड झाल्याची माहिती जामखेडमध्ये धडकताच जामखेडकरांकडून पोळ यांचे अभिनंदन केले जाऊ लागले आहे.