जामखेड टाइम्स वृत्तसेवा : किरकोळ कारणावरून उफाळलेल्या वादातून पोटच्या मुलाने जन्मदात्या वडिलांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही खळबळजनक घटना जामखेड तालुक्यातील अरणगाव येथे घडली असून या घटनेने जामखेड तालुका हादरून गेला आहे. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दि. २६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेच्या सुमारास अरणगाव शिवारातील लिंबाच्या बागेत ही घटना घडली. मयत रावसाहेब विठ्ठल सोनवणे (वय ६८ वर्षे) हे बागेत लिंबू तोडत असताना शेजाऱ्यांना शिवीगाळ करत होते. यावेळी त्यांचा मुलगा आरोपी अशोक रावसाहेब सोनवणे (वय २४ वर्षे) याने वडिलांना विचारले की, “विनाकारण शेजाऱ्यांना शिवीगाळ का करता?” याच कारणावरून बाप लेकात जोरदार वाद उफाळला.
सुरुवातीला मयत रावसाहेब यांनीच मुलाच्या अंगावर कोयता उगारला, मात्र आरोपी अशोकने त्यांच्या हातातील कोयता हिसकावून घेतला आणि त्याच कोयत्याने व जवळच पडलेल्या लाकडी काठीने वडिलांना पोटावर व पाठीवर बेदम मारहाण केली. या मारहाणीत रावसाहेब सोनवणे जागीच बेशुद्ध पडले होते.
घटनेनंतर जखमी रावसाहेब यांना तातडीने अरणगाव येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, तिथून त्यांना जामखेडला हलवण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सरकारी दवाखान्यात नेण्यात आले,मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून ‘मृत’ घोषित केले.
जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे डाॅ गिरी यांच्या खबरीवरून जामखेड पोलिस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करत सोनवणे यांच्या हत्येचा उलगडा केला आणि आरोपी मुलाला ताब्यात घेतले.
पुणे येथे झाले शवविच्छेदन
या प्रकरणातील तांत्रिक गुंतागुंतीमुळे आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने मयताचे प्रेत आधी अहिल्यानगर आणि त्यानंतर पुणे येथील ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ‘Death due to blunt trauma to abdomen’ (पोटाला बसलेल्या गंभीर फटक्यामुळे मृत्यू) झाल्याचे स्पष्ट केले आहे.
याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण अरुण इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मुलगा अशोक रावसाहेब सोनवणे याच्याविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०३(१) आणि शस्त्र अधिनियम कलम ४ व २५ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहे. या घटनेमुळे अरणगाव परिसरात मोठी खळबळ उडाली असून किरकोळ कारणावरून घडलेल्या या भीषण हत्येमुळे हळहळ व्यक्त होत आहे. मयतावर अरणगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.