मोठी दुर्घटना : रायगडमध्ये दरड कोसळून 35 जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यात पावसाने उडवला हाहाकार

रायगड : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने दाणादाण उडवली आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातही पावसाने हाहाःकार उडवला आहे. यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून (Raigad Landslide) तब्बल 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. महाड तालुक्यातील तळई गावात (Talai Village) ही भीषण दुर्घटना घडली आहे. तुफान पावसामुळे 35 घरांवर दरड कोसळली असून 80 ते 85 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे.

गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळई गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून 32 जणांचे मृतदेह बाजूला काढले. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

दरम्यान, एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासनाकडून कोणीही आलेलं नाही, अशी तक्रार इथल्या ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे जखमींवर त्वरित उपचार करावा, अशी मदतीची याचना स्थानिक करत आहेत.

एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासन संवेदनशील नाही. सरकार भावनाशून्य झालंय. शासनाच्या ही अशी निगरगट्ट यंत्रणा मी माझ्या आयुष्यात पाहिलेली नाही, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आपला संताप व्यक्त केला. माझी शासनाकडे विनंती आहे की या घटनेकडे गांभीर्याने बघून त्वरित मदत कार्य सुरू करा, अशी मागणी दरेकर यांनी केली.

महाड येथील पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून माहिती घेतली. महाड मधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे, मात्र अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टर मधील बचाव पथकाला ते दिसतील असे आवाहन प्रशासनाने केले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली.