… तर किरीट सोमय्यांची हत्तीवरून मिरवणुक काढणार  : हसन मुश्रीफांचे सोमय्यांना ओपन चॅलेंज

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । राज्यात ठाकरे सरकार सत्तेवर आल्यापासून भाजपाकडून सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहे. ठाकरे सरकारचे दोन मंत्री ईडीच्या कोठडीत आहेत. तर काही नेत्यांवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे.ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातही भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी तक्रारी केल्या आहेत. यावरूनही राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगला आहे.

हसन मुश्रीफ विरूध्द किरीट सोमय्या या सामन्याचा अंक तापू लागला आहे. सोमय्या यांच्याकडून थेट राष्ट्रवादीला टार्गेट केले जात असल्याचे दिसत आहे. सोमय्या यांनी केलेल्या आरोपांवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे आता आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. कागल तालुक्यातील करनुर दौर्‍यावर असताना मुश्रीफ यांनी सोमय्या यांना खुले अव्हान दिले आहे.

यावेळी मुश्रीफ म्हणाले की, किरीट सोमय्या यांनी मी मंत्रिपदाच्या माध्यमातून मिळविलेला भ्रष्टाचाराचा एक पैसा जरी सिद्ध केला तर त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू असे उघड चॅलेंज मुश्रीफ यांनी सोमय्या यांना दिले आहे.

कागल तालुक्यातील करनूर येथे विकासकामांच्या लोकार्पण व उद्घाटन पार पडले त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत मुश्रीफ बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते.

यावेळी मुश्रीफ पुढे म्हणाले की, मी तमाम जनतेला जाहीरपणे शपथेवर सांगू इच्छितो की, माझ्या मंत्रीपदाचा गैरवापर करून मिळवलेला एक जरी पैसा किरीट सोमय्या यांनी सिद्ध केला तर त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू. सगळ्याच यंत्रणांकडून माझी चौकशी केलेली आहे, त्यामधून काहीही हाती लागलेले नाही.माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माझ्यावर सात महिन्यापूर्वी तक्रार केली होती,  त्यामधून काहीच निष्पन्न झालेले नाही.

कोल्हापूर विधान उत्तर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लागल्यानंतर ते पुन्हा तक्रार करीत आहेत. निश्चितच हा काही विशेष योगायोग नाही. काही कोल्हापूरची मंडळी,  आमची काही कागलची मंडळी यांचे सीडीआर तपासा म्हणजे तुमच्या लक्षात येईल याच्यामागे निश्चित कोण आहे? असे सांगत जोपर्यंत गोरगरीब सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, तोपर्यंत कुणीही माझा केसही वाकडा करू शकत नाही असे मुश्रीफ म्हणाले.

मुश्रीफ पुढे म्हणाले, मुद्दही लाख बुरा चाहे, तो क्या होता है? वही होता है, जो मंजुरे खुदा होता है… गेली ३० -३५ वर्षे सर्वसामान्य,  उपेक्षित, वंचित व गोरगरीब जनतेचा आशीर्वाद व पाठबळ या जोरावरच मी ही जनकल्याणाची पताका घेऊन चालत आलो आहे.