समोर पराभव दिसताच भाजपचे उमेदवार फोडले : राम शिंदेंचा रोहित पवारांवर जोरदार निशाणा

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । डाॅ अफरोज पठाण | कायदा नियम धाब्यावर बसवून विद्यमान आमदारांनी प्रशासनास हाताशी धरत भाजपाच्या उमेदवारी अर्ज माघार घेण्यात पक्षपातीपणा केला. प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या कालच्या कारभारावर राम शिंदेंनी आपल्या भाषणात खरपूस समाचार घेतला. दोन वर्षात विद्यमान आमदारांनी काहीच केले नाही. त्यांना समोर पराभव दिसत होता म्हणूनच कर्जतच्या  राजकारणात कालचा घाणेरडा प्रकार केला अशी घणाघाती टीका माजीमंत्री राम शिंदे यांनी केली

कर्जत येथे आपले मौनव्रत सोडताना आणि भाजपा उमेदवाराच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी राम शिंदे बोलत होते. राम शिंदे यांनी आ रोहित पवार यांचे नाव न घेता त्यांच्या दोन वर्षाचे कामावर टीकास्त्र सोडले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, दिलीप भालसिंग, पक्ष निरीक्षक बाळासाहेब महाडीक, भगवान मुरूमकर, अजय काशीद, किसान मोर्च्याचे सुनील यादव, राजेंद्र म्हस्के, शांतीलाल कोपनर, काका धांडे आदी उपस्थित होते. तत्पुर्वी भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कालच्या उमेदवारी अर्ज माघार घेण्यात झालेला नाट्याच्या विरोधात शहरात मूक रॅली काढली आणि काळया फिती लावत निषेध केला.

यावेळी पुढे बोलताना राम शिंदे म्हणाले की, दोन वर्षात आमदारांनी फक्त भाजपाचे लोकप्रतिनिधी फोडून आपला राष्ट्रवादीचा झेंडा लावला. सोशल मीडियावर आणि व्हाट्सअपवर तुमचा विकास दाखवू नका. लोकांनी तुम्हाला संधी दिली आहे त्यांच्या प्रश्नावर काम करा.आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात आपण फक्त घोषणा नाही केली त्यावर प्रत्यक्ष काम केले आणि कर्जतकराचे प्रश्न सोडवले. दोन वर्षात कुकडी पाण्याचे नियोजन कोलमडून टाकण्याचे काम यांनी केले आहे. माथे फिरल्यासारखे वागू नका कर्जतची जनता तुमचे माथे जाग्यावर आणण्याचे काम करील. जे आपल्या सोबत होते आता तिकडे गेले आहे. त्यांनी काय काय केले आहे ते मी आता विसरणार नाही म्हणत पक्षांतर करणाऱ्यावर भाष्य केले. तसेच आपल्या सर्व उमेदवारांना विकासाच्या कामावर मतदान करत त्यांना संधी द्यावी असे आवाहन राम शिंदे यांनी उपस्थित जनसमुदायास केले.

जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे म्हणाले की, २०१९ साली मतदारसंघात विधानसभेला चुक झाली. आपला तो आपलाच असतो. आणि दुसरा तो शेवटी दुसराच असतो असे म्हणत आ पवार यांना लक्ष केले. दोनच वर्षात यांनी आपले रंग दाखवले. लोकांना भावनिक करून सत्ता घेतली आणि स्वार्थ साधला. बारामतीला दडपशाही करत सत्ता मिळवली असेल पण कर्जत- जामखेडला ते जमणार नाही. कारण येथील जनता स्वाभिमानी आहे.

यावेळी बोलताना दादा सोनमाळी म्हणाले की, कर्जतच्या राजकारणात काळ्या अक्षराने लिहण्याची परिस्थिती काल सर्व राज्याने पाहिली. राजकारण करत असताना कालची सारखी परिस्थिती कर्जतकरानी पहिलीच अनुभवली. भाजपाच्या महिला उमेदवारांना गाडीत घालून आणण्याचा प्रकार घडला. त्यांना साधी नजरा-नजर करताना अडचण निर्माण झाली होती. एवढी मोठी दहशत विरोधकांची पहावयास मिळत आहे.

याप्रसंगी पोलीस प्रशासन, महसुल प्रशासन हतबल झाले होते. यांनी विकास केला असेल तर लोकशाही पद्धतीने निवडणुकीस सामोरे जावे. यात दहशत निर्माण करून लोकप्रतिनिधी काय साध्य करीत आहे ? असा सवाल उपस्थित केला. कर्जतकर क्रांतिकारक आहे. ती क्रांती कर्जतकर कायम करीत असतात हे आ पवार यांनी पुढील दिवसात पाहावे.अधिक दडपशाही भविष्यात करताल तर आगामी दिवसात माती मिळताल असा सूचक इशारा आपल्या भाषणात केला.

ज्यांना तुम्ही नावे ठेवली आज त्यांनाच जवळ घेत घाणेरडे राजकारण करत असल्याचे म्हणत पक्षांतर करणाऱ्यावर टीकास्त्र सोडले. विकासाच्या नावावर मतदान मागणारे आज हातात दंडुका घेत, लोकांवर दबाव टाकत मतदान मागत आहे ही शोकांतिका आहे. मतदारांचा सर्व्हे करून राष्ट्रवादीला योग्य जागा मिळत नसल्याने असे प्रकार सुरू झाले आहे. सहा महिन्यांपूर्वी तुम्हाला कर्जतकरानी जिल्हा बँकेत दणका दिला आहे. ते ध्यानात ठेवा. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दबावात घेण्याची पद्धती सोडा.

यावेळी पक्ष निरीक्षक बाळासाहेब महाडीक, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, जामखेडचे तालुकाध्यक्ष अजय काशीद, दिलीप भालसिंग, तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे, दादासाहेब सोनमाळी यांची भाषणे झाली. प्रास्ताविक सचिन पोटरे यांनी केले तर आभार अनिल गदादे यांनी मानले. यावेळी आरपीआयचे संजय भैलुमे, विनोद दळवी, तारक सय्यद, विशाल काकडे, दत्ता कदम, रवी सुरवसे, शरद मेहत्रे, पप्पू धोदाड, गणेश पालवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

रोहित पवार यांचा पुढचा मतदारसंघ करमाळा – सुनील कर्जतकर

आ पवार यांनी सध्या करमाळा तालुक्यातील कारखान्याकडे लक्ष दिले असून पुढची विधानसभा निवडणुक ते कर्जत-जामखेड या मतदारसंघातून न लढविता करमाळयातून आमदार होण्याची तयारी करीत आहे. त्यामुळे रोहित पवार हा विषय आपण सोडून द्या आणि कर्जत नगरपंचायतीमध्ये सर्वच उमेदवारांनी कामा लागा. आणि विजय संपादन करीत विरोधकांना उत्तर द्या. जे पक्ष सोडून पळाले त्यांना आपल्या भाषणात कर्जतकर यांनी चांगलेच फटकारले.

मालकाने काम केले मात्र गड्याने पाठ थोपटून घेतली – पिसाळ

ज्याच्यावर सर्व राजकारण केले ते दुकान बंद झाल्याने गडी तिकडे गेला. राम शिंदेनी मंत्रीपदाच्या काळात कर्जत नगरपंचायतीसाठी मोठा निधी उपलब्ध केला. त्या निधीद्वारे कर्जत शहराचा विकास केला. मात्र ज्याच्या हातात निधी दिला त्या गड्याने स्वताचीच पाठ थोपटून घेतली. मात्र कर्जतची जनता सुज्ञ आहे ती विरोधकांना त्यांची जागा दाखवेल असे म्हणत नामदेव राऊत यांना अंबादास पिसाळ यांनी लक्ष केले.