मुंबई : श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने करा – सभापती प्रा.राम शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त लवकरच श्री क्षेत्र चौंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. श्री क्षेत्र चोंडी येथे संपूर्ण देशभरातील पर्यटक आणि इतिहासप्रेमींना आकर्षित व्हावेत यासाठी चोंडी विकास प्रकल्पाचा सुधारित विकास आराखडा बनवण्यात येत आहे त्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी असे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी प्रशासनाला दिले.

चोंडी विकास आराखड्याबाबत प्रा राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विधान भवन येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि दूरदृष्यप्रणालीद्वारे नाशिक विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आशिष येरेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.भरतकुमार बावीस्कर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. ही बैठक आज पार पडली.

श्री क्षेत्र चौंडी विकास आराखडा हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असावा, तसेच सर्व संबंधित विभागांची जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावर चौंडी येथे बैठक घेऊन आराखड्याच्या कामास गती द्यावी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाचे सुशोभीकरण, त्यांनी संदेश दिलेल्या जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन संकल्पनांची जपणूक, चौंडी येथे देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी सुव्यवस्थित रस्ते, संग्रहालय, महादेव मंदिर आणि चौंडीश्वरी मंदिर जीर्णोध्दार, निवास व्यवस्था, सुसज्ज वाहनतळ, स्थानिक उत्पादने, खाद्यपदार्थ यांची बाजारपेठ या सोयीसुविधांना प्राधान्य देण्यात यावे, असे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे आणि मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी आदेशीत केले.

या बैठकीत मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना चौंडी येथे होणाऱ्या प्रस्तावित मंत्रीमंडळ बैठक आयोजनासंदर्भात महत्वपूर्ण सूचना दिल्या. अशा प्रकारे ग्रामीण ठिकाणी होणारी ही राज्य मंत्रीमंडळाची पहिलीच बैठक आहे. श्री क्षेत्र चौंडी विकास आराखडा हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असावा, तसेच सर्व संबंधित विभागांची जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावर चौंडी येथे बैठक घेऊन आराखड्याच्या कामास गती द्यावी, असेही यावेळी निश्चित करण्यात आले. बैठकीत प्रस्तावित आराखड्याबाबत स्थापत्य विशारद किरण कलमदानी यांनी सादरीकरण केले.
