Mega Recruitment : महाराष्ट्रात होणार 15 हजार 511 पदांची मेगा भरती : राज्य सरकारकडून जोरदार हालचाली सुरू

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : महाराष्ट्र सरकार येत्या एप्रिल अखेरपर्यंत बंपर मेगाभरती करण्याच्या तयारीत आहे. राज्यातील 25 विभागातील 15 हजार 511 पदांसाठीची मेगा भरती (Mega Recruitment) होणार आहे. सरळसेवा व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून रिक्त पदे भरली जाणार आहेत. सरकारकडून मेगाभरतीच्या हालचाली गतिमान करण्यात आल्या आहेत. यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (MPSC) 7 हजार 460 पदांचे मागणीपत्र सादर केले जाणार आहे. तसेच ऊर्वरीत 8 हजार 61पदांचेही मागणीपत्र लवकरच केले जाणार आहे. या पदभरतीच्या माध्यमांतून गट अ, ब, क वर्गातील रिक्त पदे  भरली जाणार आहेत.

राज्य सरकारच्या महत्त्वाच्या 34 विभागातील एकुण अडीच लाखांपर्यंत पदे रिक्त आहेत. काही पदांची भरती ‘एमपीएससी’च्या माध्यमातून तर काही पदे थेट खासगी संस्थांच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने (Information and Technology Department) यापूर्वीच पाच संस्थांची निवड केली आहे.

वित्त विभागाने (Finance Department) विविध विभागांमधील महत्त्वाची पदे भरायला मान्यता दिल्याने रिक्‍त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोनामुळे (Covid-19) राज्याची आर्थिक स्थिती विस्कटली आणि महसूल (Revenue) मोठ्या प्रमाणावर कमी झाला. त्यामुळे सर्व रिक्‍त पदांची भरती होऊ शकली नाही.

तत्कालीन फडणवीस सरकारच्या (Fadnavis Government) काळात जवळपास 70 हजार पदांची मेगाभरती (Mega Recruitment) होईल, अशी घोषणा झाली, परंतु पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. महाविकास आघाडी सरकारनेही (Mahavikas Aghadi Government) सुरवातीला घोषणा केली, परंतु कोरोनाच्या संकटामुळे अजूनपर्यंत तेवढ्या पदांची भरती झालेली नाही. आता टप्प्याटप्प्याने पदभरती केली जात आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) प्राप्त झालेल्या मागणीपत्रामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग 937 जागा, कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय विभाग 924 जागा, उद्योग, ऊर्जा, कामगार विभाग 279 जागा, अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभाग 62 जागा, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग 16 जागा, सामान्य प्रशासन विभाग 957 जागा, मराठी भाषा विभाग 21 जागा, आदिवासी विभाग 7 जागा, बृन्हमुंबई महापालिका 21 जागा, पर्यावरण विभाग 3 जागा, गृह विभाग 1159 जागा, वित्त विभाग 356 जागा,

वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्ये विभाग 1572 जागा, उच्च व तंत्रशिक्षण विभाग 35 जागा, शालेय शिक्षण, क्रीडा विभाग 105 जागा, सहकार, पणन, वस्त्रोद्योग विभाग 32 जागा, कौशल्य विकास, उद्योजकता विभाग 171 जागा, महसूल व वन विभाग 104 जागा, ग्रामविकास व पंचायतराज विभाग 32 जागा, नगरविकास विभाग 90 जागा, मृदा व जलसंधारण विभाग 11 जागा, जलसंपदा विभाग 323 जागा, विधी व न्याय विभाग 205 जागा, नियोजन विभाग 55 अशी मागणीपत्रे दाखल करण्यात आली आहेत

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मागील अधिवेशनात एमपीएससीमार्फत काही दिवसांत रिक्‍तपदांची भरती होईल, अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne ) यांनीही जवळपास साडेपंधरा हजार पदांची भरती आयोगामार्फत होईल, असे स्पष्ट केले होते. त्याची कार्यवाही सुरू झाली, परंतु अजूनही आठ हजार पदांचे मागणीपत्र आयोगाकडे सादर करण्यात आलेले नाही. मात्र, काही दिवसांत संबंधित विभागातील रिक्‍त पदांचे मागणीपत्र आयोगाला पाठविले जाणार असून नववर्षात त्या पदांची भरती होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला आहे.

अजित पवार उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र

.