जामखेड : स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचे असेल तर स्कॉलरशिप व नवोदय परीक्षा महत्त्वाच्या – गटविकास अधिकारी प्रकाश पोळ

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : ग्रामीण भागातल्या गरीब शेतकऱ्याचा मुलगा शाळेत आला पाहिजे, तो शिकला पाहिजे. भविष्यात त्याने मोठे होऊन स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवले पाहिजे.त्यासाठी इयत्ता 5 वीची स्कॉलरशिप व नवोदय परीक्षा महत्त्वाची आहे. भविष्याचा तो मजबूत पाया असून तो पाया मजबूत करण्यासाठी शिक्षकांनी मेहनत घ्यावी असे अवाहन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले.

Jamkhed, If you want to succeed in  competitive exam scholarship and Navodaya exam are important, BDO Prakash Pol

जामखेड तालुका पंचायत समितीच्या वतीने जामखेडच्या ल. ना. होशिंग विद्यालय या ठिकाणी इयत्ता पाचवीच्या व इयत्ता आठवीच्या वर्ग शिक्षकांसाठी स्कॉलरशिप परीक्षा व नवोदय परीक्षा संदर्भात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा 15 रोजी पार पडली. यावेळी सर्व 5 वी व 8 वी च्या वर्ग शिक्षकांना तसेच स्कॉलरशिप शिकवणाऱ्या विषय शिक्षकांना गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी आवश्यक ते सखोल मार्गदर्शन केले.

यावेळी पुढे बोलताना पोळ म्हणाले की, जामखेड तालुक्यातील सर्व शाळांची गुणवत्ता वाढविण्याचे काम तुम्ही सर्व शिक्षकांनी जोमाने करावे. कुटुंबप्रमुख म्हणून मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेन. भविष्यात तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचे निश्चितच कौतुक होईल. तुम्हा सर्वांच्या  सहकार्याने आपला तालुका गुणवत्तेच्या बाबतीत सर्वात पुढे असेल, आपण सर्वजण हा विश्वास जपाल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पोळ पुढे म्हणाले, मी जामखेड पंचायत समितीमध्ये आल्यापासून शिक्षकांच्या तालुकास्तरावरील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी वेळोवेळी कॅम्प लावून ते सोडवले. भविष्यात सुद्धा तालुकास्तरावरील सर्व प्रश्न सोडवण्यात येतील. पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या ज्या भौतिक सुविधा देता येणे शक्य आहे. त्या सुविधा शक्य तेवढ्या शाळांना देण्यास आम्ही निश्चित प्रयत्न करू. तुमचे वैयक्तिक कुठलेही प्रश्न तालुकास्तरावर प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता आम्ही घेऊ असे पोळ यांनी यावेळी स्पष्ट केले.

जामखेड तालुक्यात स्कॉलरशिप तथा नवोदय परीक्षेमध्ये भरघोस यश मिळवणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लटकेवस्ती, दत्तवाडी, पिंपरखेड या शाळेतील शिक्षकांनी सुद्धा उपस्थित वर्ग शिक्षक व विषय शिक्षक यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये अनिता पवार माळीवस्ती शाळा, रसिका गाढवे लटकेवस्ती शाळा, मनोहर इनामदार बांधखडक शाळा, भगवान साळुंखे सर पिंपरखेड शाळा या शाळेतील शिक्षकांनी मार्गदर्शन करताना स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जर यश मिळवायचे असेल तर मुलांचा ज्ञानाचा पाया मजबूत असणे आवश्यक आहे. मिळवलेल्या ज्ञानाचे आकलन होऊन त्याचे उपयोजन करणे महत्त्वाचे आहे. तसेच सगळ्यात महत्त्वाचे सराव व सातत्य असणे गरजेचे आहे. तर स्कॉलरशिप व नवोदय परीक्षेमध्ये हमखास यश मिळवता येते.

स्कॉलरशिप व नवोदय परीक्षेच्या मार्गदर्शनानंतर नुकतेच तालुक्यात बदलून आलेले उपक्रमशील शिक्षक लहू बोराटे (Lahu Borate) यांनी शाळेचा विकास लोकसहभागाच्या माध्यमातून कसा करावा, लोकांचा सहभाग कसा गोळा करावा, त्यासाठी आपण काय केले पाहिजे ? तर शाळेचा भौतिकदृष्ट्या सर्व गुणसंपन्न विकास होऊ शकेल. यावर उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना स्कॉलरशिप व नवोदय परीक्षेच्या माध्यमातून ज्यादा तास घेऊन मार्गदर्शन केले जाणार आहे. याचा फायदा निश्चित ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या सर्व मुलांना होईल. त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडून स्पर्धा परीक्षेची तयारी तसेच त्याची आवड त्यांना या बालवयात निर्माण होऊन त्यांचे भविष्य उज्वल होण्यास मदत होईल.