सायबांनो हाफीसात तासंतास फोनवर बोलताय ? मग आता सावधान

सरकारने जारी केल्या 'नव्या' मार्गदर्शक सुचना

पुणे : शासकीय अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत मोबाईलवर बोलताना शिष्टाचार पाळत नसल्याचे निदर्शनास येत असल्याने. राज्य शासनाने अधिकाऱ्यांनी मोबाईलवर बोलताना काय काळजी घेतली पाहिजे, यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करत बेजबाबदार अधिकाऱ्यांना चपराक लगावली आहे.

शासकीय कार्यालयात अनेक अधिकारी व कर्मचारी सतत मोबाईलवर बोलत असल्याचे दिसून येतात. त्यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना नाहक ताटकळत थांबावे लागते. तंत्रज्ञानाच्या जमान्यात मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. शासकीय कामकाजात भ्रमणध्वनीचा (Mobile / Cell Phone) वापर आवश्यक बनला आहे. मात्र, याचाच फायदा घेत अनेक अधिकारी व कर्मचारी शिष्टाचार पाळत नसल्याचे आढळून आले आहेत. अशा प्रकारच्या वर्तणुकीमुळे शासनाची प्रतिमा मलीन होत असल्याचे निरिक्षण शासनाने नोंदविले आहे.

शासकीय कामकाज करताना मोबाईलचा वापरासंबंधी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे याविषयी राज्य सरकारने परिपत्रक काढले असून, नव्या मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत.

०१. कार्यालयीन कामासाठी दूरध्वनीचा वापर करताना प्राधान्याने कार्यालयातील दूरध्वनीचा (Landline) वापर करावा.

०२. कार्यालयीन वेळेत कायालयीन कामासाठी आवश्यक असेल तेव्हाच मोबाईलचा वापर करावा.

०३. मोबाईलवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा. तसेच बोलताना इतरांच्या उपस्थितीची जाणीव ठेवावी.

०४. मोबाईवर बोलताना सौम्य आवाजात बोलावे, बोलताना वाद घालू नये तसेच असंसदीय भाषेचा वापर करू नये.

०५. कार्यालयीन कामांसाठी मोबाईलचा वापर करताना लघुसंदेशाचा (Text Message) शक्यतो वापर करावा. तसेच मोबाईल फोनवर बोलताना कमीत कमी वेळेत संवाद साधावा.

०६. मोबाईल व्यस्त असताना लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कॉल्सना तात्काळ उत्तर द्यावे.

०७. मोबाईलवर कार्यालयीन कामकाजासाठी समाज माध्यमांचा वापर करताना वेळेचे व भाषेचे तारतम्य बाळगावे.

०८.अत्यावश्यक वैयक्तिक दूरध्वनी कक्षाच्या बाहेर जाऊन घ्यावेत.

०९. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात किंवा बैठकीदरम्यान असताना आपला भ्रमणध्वनी silent / vibrate mode वर ठेवावा

१०. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात / बैठकी दरम्यान भ्रमणध्वनी तपासणे, संदेश तपासणे, वापरणे अशा बाबी टाळाव्यात.

११. कार्यालयीन कामकाजासाठी दौऱ्यावर असताना मोबाईल बंद ठेवण्यात येऊ नये.