Big news : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे (MP Sambhaji Raje) यांनी आज वंचितचे नेते अॅड प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट घेतली. शाहू महाराजांचे वंशज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या वंशजांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. मराठ्यांना आरक्षण मिळावं हिच आमची भूमिका असल्याचं दोन्ही नेत्यांनी बैठकीनंतर म्हटलं आहे. संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांसोबत संवाद साधत बैठकीत झालेल्या चर्चेविषयी माहिती दिली.

मराठा आरक्षणप्रश्नी आमच्यात चर्चा झाली. मराठ्यांना आरक्षण मिळावं हिच भूमिका आहे. जाती विषमता कमी करण्यावर चर्चा झाली. मला सुद्धा शाहू महाराजांचा वारसा आहे तर प्रकाश आंबेडकरांना बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे. जर शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर एकत्र होते तर संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर का नाही? अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली आहे.

संभाजीराजे पुढे म्हणाले, राजकीय पक्षांना मराठा आरक्षणात रस नाही. परिस्थिती प्रतिकूल प्रयत्न करावे लागतील. दिल्लीत गोलमेज परिषद घेणार, खासदारांना मुख्य नेत्यांना, मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करणार. लोकांचं म्हणणं मांडून झालंय, आता सभासदांची जबाबदारी आहे.

येणाऱ्या सरकारला आरक्षणाचा मुद्दा त्रासदायक ठरेल

प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं, येणाऱ्या सरकारला आरक्षणाचा मुद्दा त्रासदायक ठरेल, सरकार चालवणं अशक्य होईल. आरक्षण समाजाला व्यवस्थेशी जोडतो. आरक्षणाबाबत राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती हवी तरच होईल. राजकीय पक्षांना मराठा आरक्षणात नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय बेकायदेशीर असंही त्यांनी म्हटलं.

राजकारणात शिळेपणा आलाय तो ताजेपणा हवा

प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं, महाराष्ट्रातील राजकारणात शिळेपणा आला आहे तो ताजेपणा हवा. जर संभाजीराजेंनी मनावर घेतलं तर ताजेपणा नक्कीच येईल. शरद पवारांचं राजकारण मी गेली अनेक वर्षे पाहतोय. शरद पवारांची भूमिका नरो वां कुंजरोवा. आपण अपेक्षा करू की शरद पवार सुद्धा येत्या काळात आरक्षणाच्या बाबत काही तरी भूमिका घेतील. संभाजीराजेंची भूमिका महत्त्वाची आहे. आरक्षण हे जसं समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं साधन आहे. तस ते अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव प्रिंसिपल आहे पण राजकारणी ते मान्य करायला तयार नाहीत. हा प्रश्न पुढे घेऊन जायचा असेल तर राजसत्तेचा पर्याय आहे. पहिली घटना दुरुस्ती सुद्धा आरक्षणाच्या मुद्द्यावर झाली असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.