गुड न्यूज : नगर-सोलापुर राष्ट्रीय महामार्गाची इ-निविदा निघाली !

आ.रोहित पवारांनी मानले कॅबिनेट मंत्री नितीन गडकरींचे आभार

जामखेड टाईम्स वृत्तसेवा

कर्जत तालुक्यातून जाणाऱ्या व अनेक जिल्ह्यांना जोडणाऱ्या नगर-सोलापुर या राष्ट्रीय महामार्ग क्र.५१६ (अ) या चौपदरी महामार्गाच्या कामाची इ-निविदा नुकतीच जाहीर झाल्याने राष्ट्रवादीचे युवा नेते,आ रोहित पवार यांनी कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष आभार मानले आहेत.

अहमदनगर – मिरजगाव – करमाळा – टेंभुर्णी क्र.५१६(अ) महामार्गाच्या नगर ते घोगरगाव या ३८.७७५ कि.मी. कामासाठी ५४७.१६ कोटी एवढा निधी तर घोगरगाव ते नगर-सोलापुर हद्द या ४१.६१५ किमी कामासाठी ६४१.४५ कोटी एवढा निधी दोन पॅकेजमध्ये राज्य शासनाच्या भारतमाला परीयोजनेतून उपलब्ध करण्यात आला आहे.

अनेक अडचणींमुळे गेली तीन ते चार वर्षांपासून या रस्त्याच्या कामाबाबतची सर्व कार्यवाही थांबली होती.महामार्गासाठी भु-संपादनाचा प्रश्न तसेच काही गावांच्या पाणी पुरवठा योजनेच्या नलिका व इतर अडचणींमुळे या कामास अडथळा निर्माण झाला होता.आ.रोहित पवारांनी या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन सर्व अडचणी समजावून घेतल्या आणि मग सुरू झाली कार्यवाही,योग्य नियोजन अन् उपाययोजना.

आ.पवारांनी लागलीच तात्काळ नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांसह उप वनसंरक्षक, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण प्रकल्प संचालक, कर्जत, श्रीगोंदे, नगर विभागाचे उपविभागीय अधिकारी, सहाय्यक संचालक नगर रचना विभागाचे अधिकारी, नगर रचनाकार, वीज विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषद लघुपाट बंधारे विभागाचे अधिकारी आदी सर्वच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ज्या-त्या विभागास आपापली जबाबदारी देऊन कार्यवाहीच्या सुचना दिल्या.

एका महिन्याच्या कालावधीनंतर आ.पवारांनी दुसरीही बैठक त्याच ठिकाणी घेतली. राष्ट्रीय महामार्गाच्या कामास गती देण्यासाठी सर्वच अधिकाऱ्यांनी आ.रोहित पवारांचा पॅटर्न राबवुन सर्व अडचणी मार्गी लावण्यातअधिकाऱ्यांनाही यश आले. भु-संपादनाची रक्कमही शेतकऱ्यांना मिळाली.त्यानंतर महामार्गाच्या या कामाचा प्रस्ताव सर्व अटी-शर्ती पुर्ण करून दिल्लीला पाठवण्यात आला.

पवार विखे युतीचा  विकासाचा नवा पॅटर्न !

एवढ्यावर आ. पवार थांबले नाहीत त्यांनी कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी यांची दोन वेळा भेट घेऊन महामार्गाच्या तात्काळ मंजुरीसाठी चर्चा व विनंती केली होती. खासदार सुजय विखे यांनीही या रस्त्याच्या कामाबाबत पाठपुरावा केला होता.केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून मंजुर करून आणलेल्या या महामार्गामुळे अनेक तालुक्यांनाच नव्हे तर जिल्ह्यांना वैभव प्राप्त होणार आहे.आ. रोहित पवारांची ही दूरदृष्टी मतदारसंघापुरतीच नव्हे तर सर्वांसाठी हिताची ठरत आहे हे मात्र नक्की !