शिवसेना बंडखोर आमदारांपैकी किती आमदार पुन्हा निवडून येणार, समोर आला धक्कादायक सर्वे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शिवसेनेत निर्माण झालेल्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत.राज्यात मध्यावधी निवडणूका झाल्यास बंडखोर शिवसेना आमदारांचा काय निकाल असेल ? याबाबतचा एक धक्कादायक सर्वे समोर आला आहे. 40 पैकी किती आमदार निवडून येणार याचा मोठा खुलासा जेष्ठ विचारवंत प्रा हरी नरके यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेल्या शिवसेना बंडखोर आमदारांपैकी किती आमदार पुन्हा निवडून येणार, याबाबत महाराष्ट्रात वेेगवेेगळी चर्चा सुरू आहे. त्यातच बंडखोर आमदारांबाबत जेष्ठ विचारवंत हरि नरके यांनी केलेल्या एका ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. (Shiv Sena Latest Marathi News)

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके (Hari Narke) यांनीही याबाबतचे ट्विट केले आहे. मित्राने केलेल्या सर्वेक्षणाचा हवाला नरके यांनी दिला आहे. शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांपैकी बहुतेक आमदार पुन्हा निवडून येणार नाहीत, असं सर्वेक्षणात आढळून आल्याचे नरके यांनी म्हटलं आहे.

‘माझे एक निवडणूक सर्व्हे करणारे मित्र आहेत. त्यांचा अभ्यास 95% पर्यंत अचूक असल्याचे अनेक निवडणुकांमध्ये सिद्ध झालेले आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी शिंदे सेनेच्या 40 आमदारांच्या मतदारसंघात नमुना सर्व्हे केला असता 40 पैकी 37 आमदार पराभूत होतील. म्हणजे मुख्यमंत्री शिंदेसाहेब राजकारण सोडणार तर,’ असं ट्विट नरके यांनी केलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत आलेल्या 50 पैकी एक आमदार पडला तरी राजकारण सोडून गावाकडे शेती करायला जाणार असल्याची घोषणा केली आहे. उलट भाजपसोबत 200 आमदार निवडून आणू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता नेमका कुणाचा दावा खरा ठरणार, याचं उत्तर निवडणुकीतच मिळेल.

शिवसेनेचे (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह इतर नेत्यांनी बंडखोर आमदार पुन्हा निवडून येणार नाही, असं भाकित केलं आहे. राजीनामे द्या आणि निवडणुकीला सामोरे जा असे थेट अव्हान शिवसेना नेत्यांकडून बंडखोर आमदारांना दिले जात आहे.