Ram Shinde Sabhapati : भारतीय राज्यघटनेमुळे भारताची जागतिक स्तरावर शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख – प्रा.राम शिंदे, पटणा पीठासीन अधिकारी परिषद 2025
Ram Shinde Sabhapati : लोकशाही संस्था बळकट करणे,सकारात्मक सहभाग नोंदवून संसद आणि राज्य विधानमंडळे यांचे वैभव टिकवणे आणि त्यायोगे लोक कल्याणाच्या प्रति प्रतिबद्धता सुनिश्चित करणे हे आपले कर्तव्य आपण चोखपणे बजावले पाहिजे असे सांगत भारतीय राज्यघटनेमुळे भारताची जागतिक पातळीवर शक्तीशाली राष्ट्र म्हणून ओळख निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी केले. (Patna Presiding Officer Conference 2025)

पाटणा येथे ८५ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे आयोजन (85th All India Presiding Officers Conference 2025 Patna) करण्यात आले आहे. देशातील सर्व राज्यांचे पीठासीन अधिकारी या परिषदेत सहभागी झाले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली पाटणा येथे पार पडलेल्या ८५ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत शिंदे बोलत होते.

“भारतीय राज्यघटनेची ७५ वर्षे: घटनात्मक मूल्यांच्या बळकटीकरणासाठी संसद आणि राज्य विधान मंडळे यांचे योगदान” या विषयावर या ८५ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत विचारमंथन होत आहे. त्या अनुषंगाने प्रा राम शिंदे यांनी आपले विचार परिषदेसमोर मांडले.

यावेळी बोलताना प्रा.राम शिंदे पुढे म्हणाले, आपली राज्यघटना पुरेशी लवचिक असून ती दिनप्रतिदिन आणखी सामर्थ्य प्राप्त करीत आहे. आपल्या संसदीय लोकशाहीने राज्यघटनेच्या या शक्तिमुळेच समोर आलेल्या संकटांचा यशस्वी सामना केला.घटना दुरुस्तीच्या संदर्भात काहींनी हेतूता गैरसमज पसरविण्याचे प्रयत्न केले मात्र अलीकडच्या निवडणुकांमध्ये जनतेने त्यांना नाकारून योग्य जनादेश दिला आहे.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचा उल्लेख करत सभापती प्रा राम शिंदे यांनी वेधले अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे लक्ष !
“लोकशाहीत स्वातंत्र्य,समता आणि बंधुता या तीन मूल्यांना अत्यंत महत्त्व आहे.एकाला सोडून दुसऱ्याचा विचार देखील करता येणार नाही.तसे झाल्यास लोकशाही संदर्भातील मूळ संकल्पनेला बाधा पोहोचेल” या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना परिषदेसमोर दिलेल्या भाषणातील सावधानतेकडे सभापती प्रा. राम शिंदे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले आणि सर्वांनी या मुल्यांप्रती कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले.

सर्वसमावेशिता आणि सर्वांना समान संधीची उपलब्धता हे आपल्या राज्यघटनेचे महत्वाचे वैशिष्ट्य त्यांनी यावेळी अधोरेखित केले. कोणतीही राजकीय, आर्थिक पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून पुढे आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या उल्लेखनीय कार्यकर्तृत्वाच्या आधारावर तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले. मोदीजी हे आपले अतुलनीय योगदान देत देशाला विकासाच्या वाटेवर पुढे नेत आहेत. हे स्वयंस्पष्ट उदाहरणच यासंदर्भात पुरेसे आहे, असेही सभापती शिंदे यावेळी म्हणाले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संसदीय कारकीर्दीचा प्रारंभ तेव्हाच्या बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काऊन्सिल सदस्यत्वापासून झाला आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले.
आपल्या उत्तुंग कार्यकर्तृत्वाद्वारे लोककल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्यांनी यावेळी कृतज्ञपुर्वक स्मरण केले.