Journalist Ashish Bora | जाहिरातीचे थकलेले पैसे मिळवण्यासाठी पत्रकारावर आली आत्मक्लेष अंदोलन करण्याची वेळ

कर्जत चे पत्रकार आशिष बोरांनी घातले गोडद महाराजांना साकडे

 

कर्जत (प्रतिनिधी) कर्जत तालुक्यातील नेत्यांना जाहिरातीची बाकी देण्याची सद्बुद्धी द्यावी अशी मागणी करत थेट ग्रामदैवत संत श्री गोदड महाराजाच्या मंदिरापुढे आत्मक्लेश आंदोलन करण्याची वेळ कर्जत येथील पत्रकारावर आली असून दि 15 ऑगष्ट रोजी सकाळी 11 वाजता कर्जत तालुक्यातील पत्रकार आशिष बोरा (Journalist Ashish Bora) एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करत जाहिरात बाकी न देणाऱ्या नेत्यांची नावे दुपारी 12 वाजता जाहीर करणार आहेत.

कर्जत तालुक्यात गेली वीस वर्षांपासून आशिष बोरा हे पत्रकारिता करत आहेत, पत्रकारिता करत असताना अनेकदा राजकीय नेत्याच्या विविध प्रसंगाच्या जाहिराती घ्याव्या लागतात संबंधित नेत्यांशी चर्चा करून या जाहिराती वृत्तपत्रात छापल्या जातात, मात्र तालुक्यातील काही नेते या जाहिरातीचे पैसेच देत नाहीत हे वास्तव आहे, अनेकदा पैसे मागून ही सदरचे नेते देऊ की करत वेळ मारून नेतात, दरम्यान वृत्तपत्र पत्रकाराना पैसे सोडत नाही मग अशा वेळ पदर मोड करून पैसे भरावे लागतात.

तालुक्यातील व कर्जत शहरातील काही नेत्याकडे अनेक वर्षांपासूनच्या थकबाकी असून त्यांना पैसे मागून कंटाळा आला आहे, विकासाच्या गप्पा मारणारे, प्रत्येक ठिकाणी आपण किती लोकांच्या उपयोगाला पडतो हे दाखविण्यासाठी पत्रकाराचा वापर करतात मात्र त्याचे पैसे द्यायची वेळ आली की अनेक जण टाळत असतात.

 

आपल्या मतदार संघातील पाच वर्षातून एकदा मतदान करणाऱ्या व्यक्तीला जपण्याचे काम करणारे आपल्या कार्यकर्त्यांवर खर्च करणारे, विविध प्रसंगी अमाप पैसा खर्च करणारे हे नेते पत्रकारांना मात्र जाहिरातीच्या पैशाच्या बाबतीत अत्यंत त्रासदायक वागणूक देतात, पत्रकार पाच वर्ष नेत्याच्या बातम्या लिहितो, तो नेता कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित असला तरी त्याचे नाव बातमीत टाकतो त्याची बायको जरी कार्यक्रमात असली तरी त्याचे नाव टाकतो मग तरीही काही नेते पत्रकारांना अशी वागणूक का देतात हे न उलगडणारे कोडे आहे.

आजच्या जमान्यात अनेक बाबी वर प्रकाश टाकला तर नेत्यांची बिकट अवस्था होऊ शकते मात्र पत्रकार संयमाने काम करतात याचा गैरअर्थ काही नेते मंडळी घेऊ लागली आहेत काय असा प्रश्न पडत असून  पत्रकार जर एखाद्याला खांद्यावर घेऊ शकतात तर त्यांना खाली ही उतरवू शकतात हि बाब राजकीय नेत्यांनी विसरता कामा नये.

अनेक नेत्यांचे अनेक उद्योग, व्यवहार, दोन नंबर, ठेकेदारी, लफडे पत्रकारा कडे त्याचे विरोधक देत असतात अशा वेळी कोणताही पत्रकार नेत्यांना त्रास देण्याच्या भूमिकेतून काम करत नाही मात्र नेते काही करून नामा निराळे राहतात व पत्रकारांना त्रास देतात हे योग्य नाही त्यामुळे या सर्व प्रकाराला कंटाळून पत्रकार आशिष बोरा यांनी आता लढण्याची तयारी सुरू केली असून त्याची पहिली पायरी ग्रामदैवत संत श्री गोदड महाराजाच्या साक्षीने त्यांना साकडे घालून 15 ऑगस्ट या स्वतंत्रता दिवसापासून केली जाणार असून त्या नंतर पुढील काम केले जाणार आहे.

पत्रकार आशिष बोरा यांनी आत्मक्लेश उपोषणाचे पत्र थेट ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज यांना लिहून शहरातील व तालुक्यातील नेत्यांना जाहिरातीचे पैसे देण्याची सद्बुद्धी द्या असे साकडे घालत 15 ऑगष्ट रोजी सकाळी 11 वाजता महाराजाच्या मंदिरासमोर उपोषणाचे पत्र दिले असून या पत्राच्या प्रती लोकप्रतिनिधी खासदार सुजय विखे, आमदार रोहित पवार, पोलीस निरीक्षक कर्जत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस, भाजपा यांच्या जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष व सर्व पत्रकार यांना देणार आहेत.

पत्रकार हा समाजातील विविध प्रश्नावर सतत लढत असतो, विविध प्रकारच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम पत्रकार करत असतात तर अनेकदा अन्याय झाल्यानंतर शासकीय पातळीवर दाद न दिल्यास अशा व्यक्तीस सर्वांत प्रथम पत्रकार आठवतात व अशा व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार ही प्रयत्न करत असतात. अनेक कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी सर्वाना पत्रकाराची गरज भासते मात्र पत्रकारांच्या अडचणीच्या काळात लोक त्याच्या बरोबर उभे राहतात का हा खरा प्रश्न आहे. पत्रकार आशिष बोरा यांनी घेतलेल्या भूमिकेवर कर्जत तालुक्यातील जनतेला काय वाटते ? जनता या आंदोलनाला पाठींबा देणार का ? हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.

ज्यांना पत्रकार आशिष बोरा यांच्या आंदोलनाला पाठींबा द्यायचा आहे त्यांनी पाठींबा म्हणून एक व्हिडिओ तयार करून पाठवावा अथवा सोशल मीडियात आपल्या भावना व्यक्त करून पाठींबा द्यावा.आपण जेवढा जास्त प्रतिसाद द्याल तेवढा दबाव या नेत्यावर वाढणार आहे. आम्ही वीस वर्षे आपल्याला सहकार्य करतो आहोत आपण आमच्या साठी एक दिवस काढावा अशी विनंती यानिमित्ताने अशिष बोरा यांनी केली आहे.

कर्जतचे पत्रकार आशिष बोरा ज्या अवस्थेतून जात आहेत तशीच अवस्था  कर्जत – जामखेड मतदारसंघातील बहुतांश पत्रकारांची आहे, प्रत्येक पत्रकार पिळवणूकीतून कधी ना कधी गेलेलाच आहे. त्यामुळे पत्रकारांना वापरून घेणाऱ्या नेत्यांना वठणीवर आणण्यासाठी मतदारसंघातील सर्वच पत्रकारांनी आता एक होऊन आवाज उठवण्याबरोबरच या नेत्यांना हिसका दाखवण्याची आवश्यकता आहे. सर्व पत्रकार संघटीत होतील अशी आशा आहे.