Meteorological Station | उच्चशिक्षित शेतकऱ्याचा नादच खुळा : शेतातच उभारले हवामान केंद्र ; खर्च अवघा 55 हजार

हवामानाच्या अंदाजाचा फायदा 3 ते 4 किलोमीटर परिसरातील शेतकऱ्यांना होतो

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  : Meteorological Station | महाराष्ट्राला गेल्या काही वर्षांपासून दुष्काळ,अतिवृष्टी व अनियमित पाऊस याचा सामना करावा लागत आहे. बदलत्या हवामानाचा फटका यंदा महाराष्ट्राला बसला आहे. अतिवृष्टीने महाराष्ट्रात हाहाकार उडवून दिला आहे. यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तर शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका शेती उद्योगाला मोठ्या प्रमाणात बसतो.

हवामानातील सतत होणारे बदल समजणे शेतकऱ्यांसाठी दिवसेंदिवस महत्त्वाचे ठरु लागले आहे. या गरजेतूनच सांगली जिल्ह्यातील जत येथील एका उच्चशिक्षित शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये हवामान केंद्राची उभारणी केली आहे. यामुळे ऊन, वारा, पावसाचे अंदाज घेऊन शेतीची नियोजन प्रगतीशील युवा शेतकरी सचिन संख करत आहेत. शिवाय या केंद्राचा आसपासच्या गावातील शेतकऱ्यांनाही फायदा होत आहे.

भारतीय शेती ही हवामानावर अवलंबून असल्यामुळे ती सतत अस्थिर मानली जाते. बदलते हवामान यामुळे शेतीवर नेहमीच संकट असते. त्यामुळे हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांना काळाची गरज बनला आहे. या गरजेतून सांगली जिल्ह्यातील जत येथील प्रगतशील शेतकरी सचिन संख यांनी आपल्या शेतात स्वतःचे हवामान केंद्र उभारले आहे.

जत हा तसा अवर्षणग्रस्त भाग. सततच्या दुष्काळी स्थितीला तोंड देत शेती करायची आणि लहरी पावसामुळे हातातोंडाला आलेले पीक हातचे जायचे हे नेहमीचेच. बेभरवशाच्या नैसर्गिक वातावरणात शेती व्यवसायाला स्थैर्य प्राप्त व्हावे यासाठी संगणक अभियंता असलेल्या सचिन संख यांनी हे आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला. संख यांची सुमारे 45 एकर शेती आहे, ज्यामध्ये ते द्राक्ष आणि डाळींबाचे उत्पादन घेतात.

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून 55 हजार रुपयांमध्ये उभ्या राहिलेल्या या यंत्रणेद्वारे त्यांना आता शेत परिसरातील तापमान, वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, हवेतील आद्रता, द्राक्ष वेलींच्या पानांवर पडणारे दव, पानातून होत असलेले बाष्फीभवन, पर्जन्यमान याची अचूक माहिती मिळू लागली आहे.

त्यामुळे पिकाच्या वाढीपासून ते काढणीपर्यंतचे नेमके नियोजन करणे शक्य झाले आहे. त्यामुळे बदलत्या हवामानामुळे व रोगांच्या प्रादुर्भावामुळे होणारे अधिकचे नुकसान सचिन संख यांना आता टाळता येत आहे. याशिवाय या हवामानाच्या अंदाजाचा फायदा 3 ते 4 किलोमीटर परिसरातील शेतकऱ्यांना देखील होत आहे.

तंतोतंत शेती ही आता काळाची गरज बनली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी गावा-गावात हवामान केंद्र उभारण्याची आवश्यकता असून केंद्र आणि राज्य सरकारने याबाबत पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत सचिन संख यांनी केले आहे, याबाबतचे वृत्त टिव्ही 9 मराठीने दिले आहे.

 

web titel : farmer from maharashtra Sangli set up meteorological station in his field cost is only 55 thousand