55 वर्षे जुनी विहिर खचली, नागरिकांचा जीव धोक्यात

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । नगर तालुक्यातील खारे कर्जुने ग्रामपंचायत हद्दीतील एक जुनी विहीर यंदाच्या पावसाळ्यात खचली आहे. या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर विहीरीची तातडीने दुरूस्ती हाती घ्यावी अशी मागणी गावकरी करत आहेत.

55-year-old well in Khare Karjune village collapsed, life of citizens in danger

नगर तालुक्यातील खारे कर्जुने ग्रामपंचायत हद्दीतील एक जुनी विहीर आहे. या विहिरीचा गावकरी अनेक वर्षांपासून वापर करत होते. मात्र आता ही विहीर खूप जुनी झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात ही विहीर खचली आहे. विहीर खचल्यामुळे त्या विहिरीजवळील रहिवासी असणाऱ्या दलित वस्तीला व ढवळे परिवाराला धोका निर्माण झाला आहे.

तसेेच अनेक गावकरी व शाळकरी मुले या ठिकाणाहून येत – जा करतात तसेच दलितवस्ती मधील लहान मुले व भिल्लवस्ती मधील लहान मुले याच विहीरीच्या परिसरात खेळत असतात त्यामुळे याठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हि विहीर जवळजवळ 55 वर्ष जुनी आहे. त्यामुळे अचानक एखादी विपरीत घटना घडून मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे सदर विहिरीचे तातडीने नूतनीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.