जामखेड : शेतकऱ्यांच्या जीवनात स्वाभिमान व आत्मनिर्भरता निर्माण करण्यासाठी आधुनिक कृषि तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचवा – डॉ. दत्तात्रय सोनवणे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कृषि संस्कृतीच्या समृद्धीसाठी आणि शेतकऱ्यांच्या जीवनात स्वाभिमान व आत्मनिर्भरता निर्माण करण्यासाठी महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेले आधुनिक कृषि तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवावे असे अवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयाचे नवनिर्वाचित सहयोगी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय सोनवणे यांनी केले.

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांची जयंती कृषि दिन म्हणून १ जुलै रोजी साजरी करण्यात येते. त्यानिमित्त हळगाव कृषि महाविद्यालयात कृषि दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कृषि दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात डाॅ सोनवणे बोलत होते. सदर कार्यक्रमास सहयोगी प्राध्यापक डॉ. गोकुळ वामन, डॉ. प्रेरणा भोसले आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. सोनवणे म्हणाले, मनुष्य प्राण्याच्या अन्न, वस्त्र, निवारा या तीन मुलभूत गरजा आहेत परंतु हवा ही निसर्ग निर्मित गरज आहे. स्वच्छ हवेसाठी प्रत्येक अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी कमीत कमी ५ रोपे लावावीत व त्यांचे संगोपन करावे. महाविद्यालय परिसरात व आसपासच्या गावांमध्ये वृक्षसंवर्धनाची चळवळ उभी करावी.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी ०१ जुलै, २०२५ रोजी प्रा. डॉ. दत्तात्रय सोनवणे यांची हाळगाव शासकीय कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता म्हणून नेमणूक केली. महाविद्यालयाचे सर्व अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. हळगाव कृषि महाविद्यालय प्रगती पथावर नेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. सोनवणे यांनी यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.

कृषि दिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर सहयोगी अधिष्ठाता डाॅ सोनवणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांनी कृषि दिनाचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अंबादास मेहेत्रे तर आभार प्रदर्शन डॉ. प्रणाली ठाकरे यांनी केले.