ज्यांना शेंदूर लावला, ते शिवसेना गिळायला निघाले आहेत, कोणत्या शक्तीसोबत पंगा घेतलाय, भाजपला अंदाज नाही – उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

मुंबई  : भाजपला ठाकरे आणि शिवसेना हे नातं संपवाचं आहे. याआधी अनेकदा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला पण आता शिवसेना संपवण्याचा डाव आखलाय, असा आरोप करत ज्यांना शेंदूर लावला, ते शिवसेना गिळायला निघाले आहेत. त्यांना भाजपची साथ आहे, भाजपला अंदाज नाही, कोणत्या शक्तीसोबत पंगा घेतलाय, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

गद्दारांना कुठल्या ना कुठल्या पक्षात जाण्याशिवाय पर्याय नाही, असे अनेक तज्ज्ञ सांगतात. काल त्यांना एका पक्षाने ऑफर दिली आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावलाय.

किती वादळ आली तरी शिवसेनेची पाळं मुळं घट्ट आहे आहेत. जे गेले त्यांचं कोणत्या भाषेत वर्णन करायचं. अन् काल त्यांनी आम्हाला गद्दार बोलू नका अशी विनंती केली. हे आम्ही नाही, त्यांनी त्यांच्या कपाळावर टिक्का लावून घेतला आहे. जे गेले आहेत, त्यांच्या बरोबर एकही शिवसैनिक गेला नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. अजय चौधरी यांना विधीमंडळाचे गटनेता केले आहे, असेही यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

2019 मध्ये सर्व समसमान ठरले होते. पण त्यानंतर जागा तर कमी दिल्याच. पण जे ठरले होते, त्याबाबात नाही म्हणाले. त्यावेळी त्यांनी अपक्ष आमदारांना साथ देत शिवसेनेच्या जागा पाडल्या. अडीच अडीच वर्ष सत्ता द्या म्हटले होते. तेव्हा नाही म्हणाले मग आता कसं जमलं. हे आधीच झालं असते, तर सन्मानं झालं असते. मनावर दगड ठेवून करायची गरज नव्हती, असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी लगावला.

गेले बरेच दिवस अरविंद सावंत कार्यालायचं उद्घघाटन करण्यासाठी बोलवत होते. पण मी दुर्लक्ष करत होतो. पण आता दुर्लक्ष करुन चालणार नाही. आमदार-खासदार म्हणतात ते ऐकावं लागतेच, असे हल्ली दिवस आहेत, असा खोचक टोमणा उद्धव ठाकरे यांनी लगावला.

मुंबईतील शिवडी येथील शिवसेना शाखेचं उद्घघाटन करण्यासाठी उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. अरविंद सावंत, सुभाष देसाई, सचिन अहिर, किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.