तिरूपती बालाजी यात्रा | शिवसैनिकाची ‘ती’ इच्छा अपूर्ण; वाटेतच काळाची झडप; शिवसैनिक सुमंत रूईकर यांच्या निधनाने महाराष्ट्रावर कोसळला दु:खाचा डोंगर

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: राजकारण म्हटलं की नेता आणि कार्यकर्ता हे समीकरण आलेच. प्रसंग कोणताही असो, आपल्या नेत्यासाठी जीवाची बाजी लावायला निष्ठावंत कार्यकर्ते कधीच मागेपुढे पाहत नाहीत.अशी अनेक उदाहरणे उभ्या महाराष्ट्राने आजवर अनेकदा पाहिली आहेत. पण बीडमधून नेता आणि कार्यकर्ता या नात्याला वेगळ्याच भावनिक उंचीवर घेऊन जाणारं एक उदाहरण समोर आलं होतं पण काळाने या नात्याला अधिक फुलू न देता हिरावून नेलं, या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्रावर मात्र दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

ही कहाणी आहे बीड जिल्ह्यातील एका निष्ठावंत शिवसैनिकाची अर्थात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निष्ठावंत लढवय्या मावळ्याची. सुमंत रुईकर असे या निष्ठावंत शिवसैनिकाचे नाव. सुमंत रुईकर आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे या दोघांमधील विलक्षण अश्या निस्मिम प्रेमाच्या नात्याने महाराष्ट्रात नवा अध्याय घडवला. आपल्या नेत्यावर प्रेम किती आणि कसं करावं ? याचं मुर्तीमंत उदाहरण सुमंत रुईकर यांनी घालून दिले. मात्र एका घटनेनं होत्याचं नव्हतं झाल्याने राज्यातील शिवसैनिकच नव्हे तर अवघा महाराष्ट्र दु:खाच्या सागरात बुडाला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी बीडमधील शिवसैनिक सुमंत रुईकर तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी पायी निघाले होते.त्यांनी यासाठी 1100 किलोमीटर पायी जाण्याचा निश्चय केला होता. एक डिसेंबर पासून रूईकर हे तिरुपतीच्या वाटेवर निघाले खरे पण वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

यापूर्वी 2019 मध्ये उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आहे. सुमंत रुईकर यांनी बीड ते तिरुपती बालाजीची पायी यात्रा पूर्ण केली होती. मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी सुमंत रुईकर यांच्या निष्ठेचे कौतुक सुद्धा केले होते आणि त्याचा सत्कार देखील केला होता.

सुमंत रुईकर आणि त्यांचा मित्र शुभम जाधव हे  दोघे तिरूपती यासाठी पायी निघाले होते. दोघे रोज 35 किलोमीटर पायी चालत होते. 31 डिसेंबरपर्यंत त्यांना तिरुपती बालाजीला पोहोचायचे नियोजन होते. शनिवारी ते कडप्पापर्यंत पोहोचले. पण रोज तीस-पस्तीस किलोमीटर चालण्यामुळे सुमंत रुईकर थकले होते. त्यातच त्यांना ताप आला. त्या अवस्थेत देखील त्यांना पुढे जायचे होते. त्यांच्या मित्राने हे घरी कळवले आणि घरच्यांनी त्यांना परत येण्याची विनंती सुद्धा केली होची मात्र त्यांनी कुणाचंही ऐकलं नाही.

घरच्यांनी विनंती केली, मित्रांनीही त्यांना पुढे जाण्यापासून थांबवलं. अखेर कशीबशी सुमंत यांची समजूत घालण्यात आली. परत येण्यासाठी कडप्पामधून रेल्वेत बसून ते बीडला परत येण्यासाठी निघाले. मात्र सोलापूर येण्याआधीच सुमंत रात्रीच तेलंगणा राज्यातील रायचूर स्टेशनवर उतरले आणि एकटेच पुन्हा तिरुपतीकडे निघाले.

अंगात ताप होता, पायात त्राण नव्हता तरी ते चालत राहिले आणि रायचूरपासून तिरुपतीच्या दिशेने 20 किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला कोसळले. दरम्यान घरची मंडळी मित्र सतत फोन करत होते. रिंग जात होती पण फोन उचलला जात नव्हता. अखेर घरच्या मंडळींनी बीडच्या पोलिसात धाव घेतली आणि हरवल्याची नोंद केली.

अखेर मोबाईलच्या लोकेशनवरून पोलिसांनी सुमंत रुईकर यांचं लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्यावर रायचूरचा पत्ता मिळाला त्यानंतर बीडहून काही मित्र रायचूरला पोहोचले. दरम्यान सुमंत तिथे बेशुद्ध अवस्थेत पडले होते. रायचूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, तोपर्यंत त्याच प्रकृती खालावली होती. अखेर सुमंत रुईकर यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सुमंत रुईकर यांच्या पश्चात पत्नी वडील आणि दोन मुलं आहेत.

नेता आणि कार्यकर्ता यांचं नातं किती अतुट आणि अजोड असावं याचं दर्शन अवघ्या महाराष्ट्राला घडवणाऱ्या एका पर्वाचा दुर्दैवी शेवट झाल्याने महाराष्ट्र दु:खाच्या सागरात बुडाला आहे.दिवंगत सुमंत रुईकर यांची बालाजीच्या दरबारात जाऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घालण्याची इच्छा मात्र अपूर्ण राहिली. सर्वांच्याच मनाला चटका लावून सुमंत रुईकर यांनी एक्झिट घेतली.