Warning of heavy rains | अहमदनगरसह राज्यात अतिवृष्टीचा इशारा; पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाचे !

हस्ताचे आगमन अन गुलाबी धुमशान

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Warning of heavy rains | गुलाब चक्रीवादळामुळे राज्यात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आले. गुलाब चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

बंगालच्या उपसागरातील हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेलं गुलाब चक्रीवादळ (Cyclone Gulab) रविवारी रात्री उशीरा दक्षिण ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला येऊन धडकलं आहे. पण आज पहाटे वाऱ्याचा वेग कमी झाल्याने या वादळाचं रुपांतर पुन्हा तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झालं आहे. याचा परिणाम म्हणून पुढील दोन ते तीन दिवस राज्यात वेगवान वाऱ्यांच्या साथीने जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.(Warning of heavy rains in the state including Ahmednagar)

विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उद्या कोकणातील जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोल्हापूर आणि सांगली हे दोन जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यासह अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ आणि गडचिरोली या सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर चंद्रपुरला रेड अलर्ट देण्यात आला असून उर्वरित महाराष्ट्रात येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील काही तासात संबंधित जिल्ह्यांत मेघगर्जनेसह वेगवान वाऱ्याच्या साथीने अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान याठिकाणी 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे (Rose Hurricane) आज सोमवारपासून (27 सप्टेंबर) नाशिकसह (Nashik) उत्तर महाराष्ट्राला पुन्हा पाऊस झोडपून काढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.नाशिक जिल्ह्याला यलो, तर जळगावला (Jalgaon) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात गुलाब चक्रीवादळ सक्रिय झाले आहे. त्यामुळे हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात दोन दिवस जोरदार पाऊस होणार असून, तर आठवडाभर पावसाचा मुक्काम राहणार आहे.

हस्त नक्षत्र सुरू

हस्त नक्षत्राला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. सकाळी 6 वाजून 42 मिनिटांनी सूर्याने हस्त नक्षात्रात प्रवेश केला. या नक्षत्राचा वाहन घोडा आहे. त्यामुळे खंडित स्वरूपाचा पाऊस होईल. यापूर्वीच्या उत्तरा नक्षत्राचे वाहन म्हैस असल्याने जोरदार पाऊस झाला, असा अंदाज दाते पंचांगामध्ये वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, हवामान विभागाने अहमदनगर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर जिल्हा आपत्ती विभागाच्या पथकांना दक्ष राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.