जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करताना पर्यावरणाची आणि मानवी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.परंतु रासायनिक खते व कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे माती आणि पाण्याच्या प्रदूषणाची समस्या वाढली, जमिनीची सुपीकता कमी झाली, तसेच पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. भविष्यातील पिढ्यांची अन्नसुरक्षा जर सुनिच्छित करायची असेल तर शाश्वत शेती ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय सोनवणे यांनी केले.

हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालय हळगाव येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.डाॅ स्वामीनाथन यांच्या मौलिक कार्याचा गौरव म्हणून यावर्षीपासून त्यांची जयंती शाश्वत शेती दिवस म्हणून साजरी करण्यात आली.
यावेळी, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय सोनावणे यांनी डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, तसेच इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी प्रतिमेस अभिवादन केले.
भारतात १९६० च्या दशकात हरितक्रांतीमुळे कृषि उत्पादनात विक्रमी वाढ झाली. ज्यामुळे देशात अन्नसुरक्षा सुनिश्चित झाली. भारत अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. आता यापुढे शाश्वत शेतीकडे जाणे आवश्यक बनले आहे. शाश्वत शेतीत पर्यावरणाची काळजी घेतली जाते, जमिनीची सुपीकता टिकवून मानवी आरोग्यासाठी सुरक्षित अन्न उत्पादन घेतले जाते, असे डाॅ सोनवणे यावेळी म्हणाले.

सदर कार्यक्रमास विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विवेकानंद कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. पोपट पवार, डॉ. गोकुळ वामन, डॉ. प्रेरणा भोसले, डॉ. संदीप मोरे, डॉ. निलेश लांडे, डॉ. महेश निकम, डॉ. अंबादास मेहेत्रे, डॉ. निकिता धाडगे, डॉ. उत्कर्षा गवारे, अर्चना महाजन, डॉ. प्रणाली ठाकरे, डॉ. किरण चौधरी, डॉ. अनिकेत गायकवाड, डॉ. धनेश्वर पाटील, शिक्षकेतर कर्मचारी संजय आढाव, संभाजी ठवाळ, सुरेश माकरे, प्रदिप धारेकर, किरण अडसुर, रामदास गुहाडे, मोबिन नदाफ, संजय सोनवणे, शशिकांत कांबळे, अनिता पुराणे उपस्थित होते.
महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांनी डॉ. स्वामीनाथन यांच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.विद्यार्थी प्रतिनिधी पायल विरकर व नुयेरा तांबोळी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा पाचरणे हिने केले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.