जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महात्मा फुले कृषि विद्यापीठ हे शिक्षण, संशोधन आणि विस्तार या तीन तत्वांवर आधारीत आहे. कृषि पदवीधारकांनी फक्त नोकरीचा ध्यास न धरता उद्योजक होण्यासाठी आणि आसपासच्या समाजातील घटकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ व महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी नुकतीच जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयास भेट दिली. विविध विभागांच्या प्रयोगशाळा विकसित करण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर भेट देऊन पेरणी केलेल्या बिजोत्पादन क्षेत्राची पाहणी केली. महाविद्यालयाच्या विकासासाठी विद्यापीठ योग्य ते सहकार्य करेल असे आश्वासन दिले. या महाविद्यालयाने पडीत क्षेत्रावर आखणी केलेल्या फळबाग प्रक्षेत्रावर केशर आंब्याच्या रोपाचे वृक्षारोपण केले. सदर भेटीदरम्यान, विद्यार्थी वसतिगृहे, ग्रंथालय, जिमखाना येथे भेट देऊन सूचना केल्या.

यावेळी बोलताना डाॅ गडाख म्हणाले की, राहूरी येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठ स्थापन होऊन ५७ वर्ष पूर्ण झालेली आहेत. आजपर्यंत या विद्यापीठाने विविध पिकांचे ३१४ सुधारीत वाण, ५४ कृषि औजारे व यंत्रे आणि १९२७ कृषि तंत्रज्ञान शिफारशी शेतकरी बांधवांसाठी दिलेल्या आहेत. विविध सहा पिकांच्या वाणांचे मूल्यांकन केले असता केवळ संशोधनामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ०३ लाख ९८ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.

या विद्यापीठा अंतर्गत कृषि शिक्षण देण्यासाठी एकूण ८१ कृषि महाविद्यालये, २७ संशोधन केंद्र आणि १७ कृषि विज्ञान केंद्रे कार्यरत आहेत. हळगाव कृषि महाविद्यालयाने शिक्षण या तत्वावर अवलंबून न राहता शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य करावे. महाविद्यालयात शिकत असताना विद्यार्थ्यांनी स्वता:ची अंगी शिस्त बाळगावी, आपले ध्येय ठरवावे, मानसिक आणि शारीरिक आरोग्य सांभाळून आपली जडण घडण करावी असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल काळे हे विद्यापीठातील ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३० जून, २०२५ रोजी सेवा निवृत्त होत आहेत, त्यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या निमित्ताने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरुपात मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकातून डॉ. अनिल काळे यांनी महाविद्यालयातील विविध विकास उपक्रमांचा इतिवृत्तांत कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. दत्तात्रय सोनावणे यांनी केले.
