ऑपरेशन टायगर : उध्दव ठाकरेंचा गड पुन्हा ढासळणार, दिल्लीत घडामोडींना वेग, सहा खासदार बंडाच्या तयारीत? shiv sena ubt mp
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मान्सून कधी दाखल होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मान्सूनने दडी मारल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. तर दुसरीकडे देशाच्या राजकारणात बंडखोरीचे पीक जोमात आले आहे. ममता बनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षातील २० खासदारांनी बंडखोरी केलीय. त्यानंतर आता महाराष्ट्रातील ठाकरे गटाचे खासदार शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश करणारी असल्याची चर्चा आहे. (shivsena ubt mp)

गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरच्या चर्चा आहेत. ठाकरे गटाचे १६ आमदार आणि ६ ते ७ खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेने प्रवेश करणार असे बोलले जात आहे. आता या चर्चा खऱ्या ठरण्याची शक्यता वाढली आहे.
परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब बाकचौरे आणि खासदार राजाभाऊ वाजे आदी खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याचं सांगितलं जात आहे.हे सर्व खासदार सध्या ‘नॉट रिचेबल’ असून ते आज लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन शिंदे गटाला पाठिंबा देण्याचे पत्र सोपवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला नऊही खासदार उपस्थित होते, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. काही खासदार ऑनलाईन उपस्थित होते, असं ते म्हणाले. तसेच या खासदारांनी तुळजाभवानी ते आईबाबांपासून साईबाबांपर्यंतची शपथ घेऊन उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं, असं राऊत म्हणाले होते. मात्र,आणाभाका घेणारे हेच खासदार आता ठाकरेंना सोडणार असल्याचं सांगितलं जात आहे.
खासदारांनी का सोडली ठाकरेंची साथ?
संजय जाधव यांना केंद्रात मंत्रिपद देण्याचं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती आहे. तसेच त्यांच्या मतदारसंघात मोठा निधीही देण्यात येईल असं आश्वासन देण्यात आले आहे.
हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनाही त्यांच्या मतदारसंघात मोठा निधी देण्यात येईल असं आश्वासन देण्यात आले आहे. त्याचसोबत 2029 साली त्यांना तिकीट देऊन पुन्हा खासदार करण्याचा शब्दही दिल्याची माहिती आहे.
ओमराजे निंबाळकर यांचेही नाव ऑपरेशन टायगरच्या यादीत असल्याची माहिती आहे. त्यांच्या भावाच्या संबंधित बँकेचे प्रकरण मिटवण्याचं आणि त्यांच्या मामांच्या कंपनीचं काम सुरळीत करण्याचा शब्द त्यांना दिल्याचे समजत आहे.
शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत भविष्य दिसत नसल्याने त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजत आहे.
थोडक्यात काय तर आधी आमदार आणि आता थेट खासदारांना खिंडार पाडत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मोठा धक्का देण्याची तयारी पूर्ण केली आहे. बुधवारी दिल्लीत होणाऱ्या घडामोडींवर आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
ठाकरे गटाकडून लोकसभा अध्यक्षांना पत्र
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार फुटून वेगळा गट स्थापन करण्याच्या चर्चा रंगत असतानाच उद्धव ठाकरे गटाने मोठी आणि महत्त्वाची राजकीय चाल खेळली आहे. संभाव्य फुटीच्या वृत्तांना पार्श्वभूमी असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने लोकसभा अध्यक्षांकडे अधिकृत निवेदन सादर करत संसदेतील पक्षाच्या मान्यतेबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे.
विशेष म्हणजे, काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना वेग आला असतानाच मध्यरात्री हे पत्र जारी करण्यात आले. त्यामुळे या पत्राकडे केवळ प्रशासकीय पत्रव्यवहार म्हणून नव्हे, तर संभाव्य राजकीय घडामोडींना दिलेले उत्तर म्हणून पाहिले जात आहे.
नेमकी काय आहे मागणी?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने लोकसभा अध्यक्षांकडे केलेल्या निवेदनात संसदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हाच एकमेव अधिकृत राजकीय पक्ष म्हणून कायम मान्यता मिळावी, अशी मागणी केली आहे.
त्याचबरोबर पक्षातून फुटून जाणाऱ्या किंवा वेगळा गट स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही गटाला स्वतंत्र ओळख, अधिकृत दर्जा, संसदीय सुविधा अथवा विशेषाधिकार देऊ
संजय राऊतांचे सुचक ट्विट
अपना सपना मनी..मनी! महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी… आज रात्री प्रत्येकी १५ कोटींचा ॲडव्हान्स देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे!” असे खळबळजनक ट्विट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
खासदार पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच संजय राऊत यांनी हा ‘एडवांस’चा नवीन बॉम्ब टाकला आहे. खासदारांच्या खरेदी-विक्रीसाठी आज रात्रीच कोट्यवधींचे व्यवहार होणार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. हा आरोप करताना त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केल्यामुळे चर्चा सुरू आहेत.