अखेर काँग्रेसमधील घराणेशाही मोडीत, अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Congress presidential elections । देशातील प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला (Indian National Congress) पूर्णवेळ अध्यक्ष कधी मिळणार याची प्रतिक्षा संपली. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी बाजी मारली आहे. जेष्ठ नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांचा खर्गे यांनी पराभव केला. दरम्यान काँग्रेसमधील घराणेशाहीबद्दल सातत्याने होणारे आरोपही खर्गे यांच्या निवडीमुळे मोडीत निघाले आहेत.

Congress President Poll Results, Mallikarjun Kharge wins the Congress presidential elections with 7897 votes,

तब्बल २४ वर्षानंतर काँग्रेसला मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रूपाने गांधी – नेहरू कुटुंबाबाहेरील व्यक्ती अध्यक्ष मिळाला आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांना ७,८९७ मते मिळाली आहेत. तर शशी थरूर यांना सुमारे १,००० मते मिळाली असून ४१६ मते बाद ठरली आहेत.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी ९६ टक्के मतदान झाले होते. आज मंगळवारी (दि.१९) मतमोजणी झाली. खर्गे यांना गांधी कुटुंबाचा पाठिंबा राहिला असल्याचे समजते. काँग्रेसच्या बहुतांश वरिष्ठ नेत्यांनी खर्गे यांना पाठिंबा जाहीर केला होता. यामुळे त्यांचा या निवडणुकीत विजय निश्चित होता.

९,९०० पैकी ९,४०० वर प्रदेश काँग्रेससमिती प्रतिनिधींनी गुप्तमतदानाद्वारे पक्षप्रमुख निवडीसाठी आपापला कौल दिला होता. पक्षाच्या १३७ वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा एआयसीसी मुख्यालय आणि देशभरातील ६८ मतदान केंद्रांवर मतदान झाले.

राहुल गांधी यांनीही भारत जोडो यात्रा शिबिरात संगनाकल्लू येथे उभारलेल्या बूथवर रांगेत उभे राहून मतदान केले होते. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि प्रियांका गांधी-वधेरा यांनी दिल्लीतील एआयसीसी मुख्यालयात मतदान केले होते. महाराष्ट्रातून ५६१ पैकी ५४७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. (Congress President Poll Results)

गांधी घराण्याचे दीर्घकाळ निष्ठावंत म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांना ओळखले जाते. खर्गे यांना तीनवेळा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली आहे. १९९९, २००४ आणि २०१३ मध्ये ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. पण तीनवेळा त्यांना अपयश आले. या काळात अनुक्रम एस एम कृष्णा, धरम सिंह आणि सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपदी बाजी मारली.

माजी विद्यार्थी नेते, गुलबर्गा शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नऊ वेळा आमदार राहिलेल्या खर्गे यांनी कधीही आशा सोडली नाही. त्यांना लोकसभा आणि आता राज्यसभेतील पक्षाचा नेता म्हणूनच आतापर्यंत समाधान मानावे लागले आहे. आता गांधी घराण्याच्या पाठिंब्यावर अध्यक्षपदावर विराजमान झाले आहेत.

हिंदी भाषेवर प्रभुत्व असलेले स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष झालेले दक्षिणेतील ते सहावे नेते ठरले आहेत. खर्गे पहिल्यांदा १९६९ मध्ये त्यांच्या मूळ ठिकाणी गुलबर्गा शहर काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते. त्यानंतर खर्गे यांची राज्याच्या राजकारणात प्रदीर्घ कारकीर्द राहिली. १९७२ मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. ते विधानसभा निवडणुकीत आठ वेळा निवडून आले आहेत.

१९७६ मध्ये देवराज सरकारमध्ये ते पहिल्यांदा मंत्री झाले होते. त्यानंतर ते आमदार असताना १९८० मध्ये गुंडू राव, १९९० मध्ये एस बंगारप्पा आणि १९९२ ते १९९४ दरम्यानच्या एम वीरप्पा मोईली सरकारमध्ये मंत्रा राहिले आहेत. ते १९९६-९९ आणि २००८-०९ मध्ये विरोधी पक्षनेते होते आणि २००५-०८ पर्यंत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. २००९ मध्ये त्यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. त्यांना मनमोहन सिंग मंत्रिमंडळात पहिल्यांदाच कामगार मंत्री म्हणून संधी मिळाली. त्यानंतर रेल्वे आणि सामाजिक न्याय मंत्री ही खातीदेखील त्यांनी देण्यात आली होती.