लग्नात नाव का पुकारले नाही? म्हणत तलाठ्याचा ग्रामपंचायत सदस्यावर हल्ला, जामखेड तालुक्यातील धक्कादायक प्रकार !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथील एका विवाह सोहळ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नात स्वागत करत असताना, आपले नाव का पुकारले नाही ? असे म्हणत एका तलाठ्याने ग्रामपंचायत सदस्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात ग्रामपंचायत सदस्य जखमी झाले आहेत. हल्लेखोर तलाठ्याविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

जामखेड तालुक्यातील राजुरी येथील मंगल कार्यालयात जवळा येथील एक विवाह सोहळा ११ जूलै रोजी दुपारी पार पडला. या विवाह सोहळ्यात जवळा गावातील तरूण तडफदार युवा नेते तथा जवळा ग्रामपंचायतचे सदस अशोक पठाडे हे सूत्रसंचालन करून आलेल्या पै पाव्हण्यांचे नातेवाईकांचे, प्रतिष्ठित नागरिकांचे स्वागत करत होते.
त्याचवेळी जवळा गावातील रहिवासी असलेला शिवाजी हजारे हा तलाठी पठाडे यांच्या जवळ गेला. “माझे नाव माईकवर का पुकारले नाही?” असा जाब विचारत त्याने अशोक तठाडे यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी हजारे याने पठाडे यांच्या हातातील माईक हिसकावून घेत पठाडे यांच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात पठाडे हे जखमी झाले. आरोपीने शिवीगाळ करत पठाडे यांच्या तोंडावर मारहाण केली. “तुला खल्लास करतो” अशी धमकी देऊन आरोपी तलाठी घटनास्थळावरून पळून गेला.
या प्रकरणी अशोक पठाडे यांच्या फिर्यादीवरून तलाठी शिवाजी सखाराम हजारे याच्या विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.