जामखेड : चौकशी अहवालात ग्रामविकास अधिकारी शिंदे आढळले दोषी, ग्रामपंचायत सदस्यांच्या लढ्याला मिळाले मोठे यश, अरणगावमधील उपोषणाचे अंदोलन तुर्तास मागे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यातील अरणगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक मनमानी कारभार करत असल्याच्या निषेधार्थ आक्रमक झालेल्या विरोधी गटातील चार ग्रामपंचायत सदस्यांनी, जामखेड पंचायत समितीकडे केलेल्या तक्रारीनंतर 9 रोजी उपोषणाचे अंदोलन हाती घेतले होते. ग्रामपंचायत सदस्यांनी पुकारलेल्या या लढ्यास मोठे यश आले आहे. गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालात ग्रामविकास अधिकारी शिंदे बी एम हे प्रथमदर्शनी दोषी आढळुन आले आहेत. त्यांच्याविरोधात जामखेड पंचायत समितीने कारवाई हाती घेतली आहे.

अरणगांव ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी हे संगनमताने मनमानी कारभार करत आहेत, अरणगांव ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराचा विरोधात ग्रामपंचायतच्या सदस्या रब्बाना सादिक शेख, रुपाली शंकरराव गदादे, गजराबाई चंद्रकांत पारे, तात्यासाहेब बलभीम निगुडे या चार ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ आणि तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर पंचायत समितीने चौकशी समिती नेमली होती. मात्र सत्ताधाऱ्यांविरोधात एकवटलेल्या विरोधकांनी 9 रोजी उपोषणाचे अंदोलन सुरु केले होते. 

या अंदोलनाला राष्ट्रवादीचे नेते संतोष निगुडे, राष्ट्रवादीचे युवा नेते शंकरशेठ गदादे, सादिक शेख प्रविण मधुकर निगुडे, अंगद निगुडे,धीरज राऊत, रमेश सोनवणे, अंकुश गवळी, देवा निगुडे, राजू नन्नवरे,रवी भोगे, संतोष कोथमिरे, शकुंतला संतोष निगुडे, रामदास गदादे, नवनाथ ससाणे, परमेश्वर निगुडे, अमीर शेख या ग्रामस्थांनी उपोषणास पाठिंबा देत उपोषण सुरु केले होते.

महसुलच्या पत्रावर उपोषणकर्त्यांचे असमाधान

वरील सर्व मागण्यांसाठी अरणगाव ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ अरणगांव ग्रामपंचायत कार्यालयासमोर दि 9 रोजी उपोषणास बसले होते.दरम्यान उपोषणस्थळी मंडल अधिकारी बाळासाहेब लटके आणि तलाठी सुर्यकांत सरोदे, पोलिस पाटील दत्तात्रय निगुडे यांनी दुपारी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली. पारेवाडी गौण खनिज प्रकरणात दंडाची नोटीस बजावण्यात आलेली आहे, सदर दंड वसुल करण्याबाबत कारवाई सुरु आहे, त्या प्रकरणात लवकरात लवकर दंड वसुल केला जाईल असे लेखी पत्र दिले, मात्र उपोषण कर्त्यांचे समाधान झाले नाही.गट नंबर 147 सरकारी विहिरीवरील खरिप व तलावातील सांडव्यामधील मुरुम उत्खनन बाबत चौकशी करून अहवाल जामखेड तहसिल कार्यालयात सादर केलेला आहे. व त्याबाबत दंडात्मक कारवाई सुरु असे लेखी पत्र दिले. मात्र उपोषणकर्त्यांचे समाधान झाले नाही.

चौकशी अहवालात ग्रामविकास अधिकारी आढळले दोषी

दरम्यान, अरणगाव सरपंच आणि ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराविरोधात एकवटलेल्या ग्रामस्थांची सहाय्यक गटविकास अधिकारी दयानंद पवार यांनी सायंकाळी भेट घेऊन चर्चा केली. ग्रामस्थांच्या अनेक मागण्यांवर प्रशासनाकडून कारवाई सुरु करण्यात आल्याचे लेखी पत्र त्यांना दिले. यात म्हटले आहे की, आपण दिलेल्या निवेदनानुसार सहाय्यक गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी (पंचायत) यांना चौकशी कामी नियुक्त करण्यात आले, सदर चौकशी समितीचा अहवाल पंचायत समितीला प्राप्त झाला आहे. 151 पानांच्या अहवालात ग्राम विकास अधिकारी बी.एम.शिंदे हे प्रथमदर्शनी दोषी आढळुन आले आहेत, त्यानुसार शिंदे यांची वेतनवाढ बंद करण्याबाबतचा निर्णय पंचायत समिती प्रशासनाने घेतला आहे. त्यानंतर अरणगांव ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.

उपोषणकर्ते म्हणतात काही मुद्द्यांवर आमचे समाधान नाही

दरम्यान, उपोषण सोडताना अरणगाव ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या नावे एक पत्र लिहले आहे. त्यात म्हटले आहे की, पंचायत समितीचे प्रतिनिधींनी उपोषणस्थळी भेट दिली. त्यांनी आम्हाला चौकशी अहवाल दिला. या अहवालातील काही मुद्द्यांवर आमचे समाधान झालेले नाही. त्या मुद्द्यांवर आम्ही आपणास फेर चौकशीची मागणी करणार आहोत, या अटीवर आजचे उपोषण आम्ही मागे घेत आहोत, असे म्हटले आहे. या पत्रावर ग्रामपंचायत सदस्या रब्बाना सादिक शेख, रुपाली शंकरराव गदादे, गजराबाई चंद्रकांत पारे, तात्यासाहेब बलभीम निगुडे यांच्या सह्या आहेत.

या मागण्यांसाठी सुरु होते उपोषणाचे अंदोलन

अरणगाव येथील पाणी पुरवठा महिन्याला एकदा होत आहे पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत आहे तो सुरळीत करण्यात यावा, मागील चार महिन्यांपासून सरपंच व ग्रामसेवक मासिक मीटिंग न घेता मनमानी कारभार करत आहेत त्यांची चौकशी लावून कायदेशीर कारवाई करण्यात यावी,माहितीचे अधीकार अर्ज देऊन, अपील करून देखील नियमभंग करून माहिती देण्यास ग्रामसेवक टाळाटाळ करत आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,मासिक मीटिंग न घेता किंवा कोणत्याही मासिक मीटिंगमध्ये ठराव न घेता बोगस कामे दाखवून ग्रामपंचायतच्या खात्यात रक्कम उचलण्यात आलेली आहे, त्याची चौकशी करुन ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

तसेेच अरणगाव पशु वैद्यकीय अधिकारी कायम गैरहजर असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे, म्हणून त्यांना गाव देऊन कायम हजर राहण्याबाबत आदेश द्यावेत, अरणगाव येथील शासकीय विहिरीवरील गौण खनिज चोरी केल्या बाबत आपल्या कडील तक्रारीची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, पारेवाडी स्मशानभूमी येथील गौण खनिज उत्खनन झाल्याचे सिद्ध झालेले आहे व दोषींना तहसीलदार साहेब यांनी दंड देखील अकारलेला आहे, परंतु राजकीय दबावापोटी संबधितांकडून अजून देखील दंड वसूल करण्यात आलेला नाही, तो लवकरात लवकर वसूल करण्यात यावा, अरणगावचे ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभार, सतत गैरहजर, नियमबाह्य काम इत्यादी वेळोवेळी लिखीत तक्रारी करून देखील त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही, त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी.