जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील नान्नज येथील आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या कुटुंबातील सदस्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी नान्नज गावात मंगळवारी (२६ रोजी) कडकडीत बंद पाळून घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. नान्नज बंदला यावेळी मोठा प्रतिसाद मिळाला. गावातील सर्व दुकाने दिवसभर बंद होती.

जामखेड तालुक्यातील नान्नज येथे रविवारी एका टोळक्याने आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या कुटुंबातील सदस्यांवर सशस्त्र हल्ला करत मोठा धुमाकूळ घातला होता. आरोपींनी या हल्ल्यात गज, काठ्या, तलवारी व कोयत्यांचा वापर करत नंगानाच केला. या घटनेने नान्नज परिसरात मोठी खळबळ उडवून दिलीय.नागरिकांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याघटनेच्या निषेधार्थ मंगळवार २६ रोजी नान्नज गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. गावातील सर्व लहान मोठी दुकाने दिवसभर बंद होती.

नान्नज गावात २४ ऑगस्टच्या रात्री सुनील साळवे यांच्या कुंटुंबातील सदस्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेत ७ जण जखमी झाले आहेत. त्यातील तिघांवर पुणे व नगर येथे उपचार सुरु आहेत. या घटनेप्रकरणी १४ जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.साळवे कुटुंबांवर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आज मंगळवारी नान्नज गावात सर्व दुकाने बंद ठेऊन कडकडीत बंद पाळण्यात आला. बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. जामखेड पोलीसांनी दिवसभर चोख बंदोबस्त ठेवला होता.नान्नजमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
नान्नज घटनेप्रकरणी आंबेडकरी समाज आक्रमक
नान्नज येथील साळवे कुटुंबावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे तीव्र पडसाद आंबेडकरी समाजात उमटू लागले आहेत. साळवे कुटुंबावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींच्या तातडीने मुसक्या आवळाव्यात अन्यथा जामखेड शहर बंदचे अंदोलन हाती घेऊ, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विकी (भाऊ) सदाफुले यांनी जामखेड पोलिस स्टेशनला २६ रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.