India Pakistan War 2025 : भारत पाक युद्ध; जामखेड पोलिसांकडून नागरिकांसाठी मार्गदर्शक सुचना जारी !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : भारत पाकिस्तान युध्दाच्या पार्श्वभूमीवर (India Pakistan War 2025) देशभर अलर्ट जारी करण्यात आला आहे. युध्दजन्य परिस्थितीत नागरिकांनी खबरदारी घेण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून उपाययोजना राबवण्यास सुरूवात झाली आहे. भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या अनुषंगाने नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीबाबत जामखेड पोलिसांकडून मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहे. या सुचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, असे अवाहन जामखेडचे पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे. (Operation Sindoor)

India Pakistan War 2025, Jamkhed Police issues guidelines for citizens in connection with the India-Pakistan War

पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान समर्थित दहशतवाद मोडीत काढण्यासाठी ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) हाती घेतले आहे. यामुळे दोन्ही देशात तणाव वाढला आहे. भारत पाकिस्तान संभाव्य युध्दाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.

युध्दजन्य परिस्थितीत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे अवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. राज्याचे पोलिस महासंचालक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरक्षक, जिल्ह्याधिकारी पंकज आशिया, पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या सुचनाच्या अनुषंगाने जामखेड पोलीसांकडून खालील मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत.

१. अफवांवर विश्वास ठेवू नका

२. ⁠फक्त सरकारी अधिकृत स्रोतांकडून (जसे की आकाशवाणी, दूरदर्शन, सरकारी वेबसाइट्स किंवा अधिकृत सोशल मीडिया हँडल्स) मिळणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवा.

३. कोणत्याही धार्मिक, जातीय भावना दुखावतील अशा टिप्पणी करू नका

४. ⁠सोशल मीडिया, व्हॉट्सऍप, किंवा अज्ञात स्रोतांवर येणाऱ्या संदेशांना प्रतिसाद देऊ नका.

५. जर तुम्हाला संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू दिसली, तर त्वरित पोलिस किंवा प्रशासनाला कळवा. Dial 112 ची योग्य मदत घ्या.

६. ⁠माहितीची पडताळणी: कोणतीही बातमी सामायिक करण्यापूर्वी ती “फॅक्ट-चेक” करा. खोटी माहिती पसरवणे गुन्हा आहे.

७. ⁠कोणत्याही प्रकारची अनोळखी apk file, link ओपन करू नये. त्यामागे विघातक कृत्य/ सायबर अटॅक असू शकते अथवा शत्रू राष्ट्र आपली महिती चोरी करू शकते.

८. ⁠शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करा.

९. ⁠ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत अधिकारी आणि पोलीस अंमलदार पोहोचवतील त्यावेळी जास्तीत -जास्त लोकांनी यामध्ये माहिती घ्यावी आणि प्रशासनास सहकार्य करावे.

10. अहिल्यानगर पोलिसांचा सायबर सेल समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत असून पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करत असून शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर गुन्हे नोंद करण्यात येतील.

11. सर्व सोसायटी मधील सर्व सदस्य /नागरिकांनी बैठक घेउन  त्यांनाही ‘ब्लॅकआऊट’ बाबत जागरूकता निर्माण करावी.

12. सैन्याच्या तयारी संबधित गतिविधीचे चित्रिकरण करणे आणि ते समाजमाध्यमांवर प्रसारित करणे या गुन्हा असून देशाची युद्ध तयारी ची माहिती यामुळे दुश्मन राष्ट्राला होऊ शकते यामुळे असे चित्रीकरण कोणी करू नये.

सर्व नागरिकांनी वरील निर्देशांचे पालन करून शांतता आणि विवेक राखून देशाच्या सुरक्षा अंखडीत राखण्याकरिता सहकार्य करावे असे अवाहन जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे.