जामखेड : जवळा पंचायत समितीचे स्वप्न भंगताच अनेकांचा झेडपीवर दावा, इच्छूकांनी ‘सोशल मीडियावर’ थोपटले दंड ! राजकीय वातावरण तापले
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख : गेल्या तीन चार वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीचे पडघम आता वाजले आहेत. येत्या काही दिवसांत निवडणूक कार्यक्रमांची घोषणा होणार आहे. १३ रोजी गण व गटांच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली. यामध्ये जवळा गण अनुसूचित जाती (महिला) साठी राखीव झाला आहे. जवळा गण राखीव होताच पंचायत समितीच्या अनेक इच्छूकांनी थेट जिल्हा परिषदेवर दावा ठोकला आहे. या इच्छुकांनी ‘सोशल मीडियावर’ निवडणूकीसाठीचे दंड थोपटले आहेत. जवळा गटांत यंदा इच्छूकांचा भरणा अधिक असणार आहे. त्यामुळे तगड्या उमेदवारांची डोकेदुखी वाढणार आहे. (Jamkhed Panchayat Samiti Election 2025)

जामखेड तालुक्याच्या राजकारणातील सर्वात लक्षवेधी असलेल्या जवळा जिल्हा परिषद गटात यंदा होणारी लढत महत्वपूर्ण असणार आहे. हा गट ओबीसी महिलेसाठी राखीव झाला आहे. अरणगाव गण ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. या गणातून विजयी होणारी महिला उमेदवार थेट पंचायत समितीची सभापती होणार आहे. जवळा गण यंदा अनुसुचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाला आहे. या गणातून निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या इतर प्रवर्गातील उमेदवारांनी थेट जिल्हा परिषद गटावर दावा ठोकत मोर्चेबांधणी हाती घेतली आहे. सोशल मीडियावर या इच्छूकांनी मोठा धुराळा उडवून दिला आहे. जवळा गटावर यंदा महिलाराज येणार आहे. (Zilla Parishad Election 2025)

जवळा जिल्हा परिषद गटात भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छूकांचा भरणा अधिक आहे. अनेक तगड्या उमेदवारांनी आपली दावेदारी पेश केली आहे. काही ‘फुसक्या’ इच्छूकांनी सुध्दा सोशल मीडियावर चमकोगिरी सुरू केली आहे. राष्ट्रवादीसह इतर पक्षांत बोटावर मोजण्या इतके इच्छूक आहेत. त्यातील काही जण अद्यापही सक्रीय दिसत नाहीत. जे सक्रीय आहेत त्यातील काहींचा बार पुरता फुसका आहे, अशीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
जवळा गट हा विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांचा बालेकिल्ला आहे.शिंदे कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. प्रा शिंदे यांना प्रभावित करण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी जोरदार तयारी हाती घेतली आहे. गावोगावचे राजकीय वातावरण तापू लागले आहे. इच्छूक उमेदवारांचे समर्थक सोशल मीडियावर सक्रीय झाले आहेत. ऐन कडाक्याच्या थंडीत रंगणाऱ्या राजकीय युध्दामुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.
जवळा गटांतील सर्वपक्षीय इच्छूक उमेदवारांनी निवडणूकीची जोरदार मोर्चेबांधणी हाती घेतली आहे. जनसंपर्क वाढवण्यासाठी त्यांनी आपली यंत्रणा सक्रीय केली आहे. काहींनी गेल्या काही महिन्यांपासून निवडणूकीची तयारी हाती घेतली आहे. अश्या काही इच्छूकांनी थेट जनतेत न जाता आपल्या यंत्रणेच्या माध्यमांतून आपले नाव चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना जनतेतून अल्प प्रतिसाद आल्याने ते इच्छूक आता संभ्रमावस्थेत गेले असल्याची जोरदार चर्चा आहे.
येत्या काही दिवसांत सर्वपक्षीय इच्छूक उमेदवार जनतेत कसे जातात, जनता त्यांना कसा प्रतिसाद देते यावरच त्यांच्या उमेदवारीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. गेल्या पाच वर्षांत जे कार्यकर्ते कायम जनतेच्या हिताची लढाई लढले त्यांना अडचण नसली तरी गाफिलपणा त्यांना प्रचंड महागात पडू शकतो, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. यंदाच्या निवडणुकीत जवळा गटावर महिला राज येणार आहे, या निवडणुकीत कोणाला उमेदवारी मिळणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.