मुलांच्या मनात टोकाचे विचार का येतात? जामखेडची घटना समाजासाठी मोठा इशारा! पालक व समाजाने कोणती पावलं उचलायला हवीत? जाणून घ्या सविस्तर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख : जामखेडमध्ये नुकत्याच घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण शहराला हादरवून सोडले आहे.नववीत शिकणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीने आयुष्य संपवले.टोकाचं पाऊल उचलतं तिने आयुष्य का संपवलं असावे ? याचा पोलिस शोध घेत आहेत. ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर संपूर्ण समाजासाठी एक मोठा इशारा आहे.’आपलं मूल सुरक्षित आहे का?’, ‘ते कोणत्या विचारात आहे?’ असे प्रश्न आज प्रत्येक पालकाच्या मनात अस्वस्थता निर्माण करत आहेत. कोवळ्या वयातील मुला-मुलींच्या आत्महत्यांचा वाढता आलेख ही केवळ आकडेवारी नाही, तर आपल्या समाजातील वाढता तणाव आणि संवादाचा अभाव दाखवतो. हा प्रश्न केवळ एका कुटुंबाचा नसून, तो आपल्या सर्वांचा पर्यायाने महाराष्ट्राचा आहे.

Why do children have extreme thoughts, Jamkhed incident is big warning for society, What steps should parents and society take?, jamkhed ghatana, jamkhed news today

आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांवर अनेक प्रकारचा दबाव असतो. शैक्षणिक स्पर्धा, सोशल मीडिया, ऑनलाइन बुलींग, रोड रोमिओंचा त्रास आणि घरातील कलह यांसारख्या अनेक कारणांमुळे मुलांचे मानसिक संतुलन ढासळू लागले आहे. अनेकदा पालक मुलांच्या वागण्या-बोलण्यातील बदलांकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत, ज्यामुळे मुलं एकटी पडतात आणि चुकीचे निर्णय घेतात.

आत्महत्येला कारणीभूत ठरणारी कारणं

  • तज्ज्ञांच्या मते, किशोरवयीन मुलांमध्ये आत्महत्येची अनेक कारणे असू शकतात:
  • शैक्षणिक अपयश आणि स्पर्धेचा दबाव: निकालात कमी गुण आल्यामुळे मुलं स्वतःला अपयशी समजू लागतात.
  • कौटुंबिक कलह: घरात सततची भांडणं, पालकांमधला तणाव किंवा मुलांकडे दुर्लक्ष होणे.
  • सोशल मीडियाचा गैरवापर: सतत तुलना, टिंगल, नकारात्मक कमेंट्स आणि ऑनलाइन बुलींग.
  • रोड रोमिओंचा त्रास: मुलींना असुरक्षित वाटणे किंवा छेडछाडीमुळे मानसिक तणाव वाढणे.
  • मानसिक आरोग्य समस्या: डिप्रेशन, सततची चिंता आणि झोप न लागणे.
  • नातेसंबंधातील ताण: मैत्री किंवा प्रेमसंबंधातील ताणतणाव किंवा तुटवडा.

पालकांनो, मुलांच्या मनात डोकावून बघा

मुलांच्या मनात काय चालले आहे, हे समजून घेण्यासाठी पालकांनी काही गोष्टी करणे आवश्यक आहे:

  • दररोज संवाद साधा : फक्त ‘अभ्यास झाला का?’ असे विचारू नका. मुलांशी त्यांच्या आवडी-निवडी, मित्र आणि भावनांबद्दल मोकळेपणाने बोला.
  • तुलना करणे टाळा: प्रत्येक मूल खास आहे. ‘शेजारचं मूल चांगलं शिकतं’ किंवा ‘त्याला जास्त मार्क मिळाले’ अशा तुलना टाळा. त्याऐवजी त्यांच्या प्रयत्नांची आणि मेहनतीची प्रशंसा करा.
  • चुकांना माफ करा: अपयश आल्यास प्रोत्साहन द्या, नकारात्मक बोलू नका. चुकांमधून शिकण्याची संधी द्या.
  • मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या: मुलांच्या वागण्यात कोणताही मोठा बदल दिसल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला अजिबात संकोच करू नका.
  • सोशल मीडिया वापरावर नियंत्रण ठेवा: मुलांच्या मोबाईल वापराच्या वेळेवर लक्ष ठेवा आणि अनावश्यक तुलना टाळण्यासाठी मदत करा.

शाळा फक्त ज्ञान देणारी नाही, आधार देणारी हवी!

शिक्षक आणि शाळा मुलांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मुलांच्या वर्तनात होणारे बदल त्यांना लवकर लक्षात येतात. बदल लक्षात येताच शिक्षकांनी वेळीच पालक व विद्यार्थी यांच्याशी एकत्रित सविस्तर संवाद साधायला हवा. शाळा ह्या निव्वळ ज्ञान देणाऱ्या न राहता विद्यार्थ्यांना मानसिक आधार देणाऱ्या ठरायला हव्यात. यादृष्टीने शाळांनी नियमितपणे खालील प्रयोग राबवायला हवेत.

  • वर्गात नियमित समुपदेशन सत्रे घ्या: यामुळे विद्यार्थी त्यांच्या समस्या मोकळेपणाने मांडू शकतील.
  • प्रयत्नांचे कौतुक करा: केवळ निकालावर लक्ष न देता विद्यार्थ्यांच्या मेहनतीला महत्त्व द्या.
  • मानसिक आरोग्य जागरूकता शिबिरे भरवा: विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याचे महत्त्व समजावून सांगा.

समाजाची जबाबदारी: फक्त बघ्याची भूमिका नको

  • मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी केवळ पालकांची नाही, ती संपूर्ण समाजाची आहे.
  • पोलिसांनी गस्त वाढवावी: शाळा आणि क्लासेसच्या परिसरात पोलिसांची गस्त वाढवून रोड रोमिओंवर कठोर कारवाई करायला हवी, जेणेकरून मुली सुरक्षित राहतील.
  • स्थानिक हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध करा: मदतीची गरज असलेल्या मुलांसाठी आणि पालकांसाठी पोलिस प्रशासनाने स्थानिक पातळीवर मदत क्रमांक उपलब्ध करून द्यावा.
  • मुलांची टिंगलटवाळी किंवा बदनामी करणे टाळा.
  • मुलांमधील ‘वॉर्निंग साईन्स’ ओळखा

मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, आत्महत्या ही क्षणिक निराशेची प्रतिक्रिया असते. योग्य वेळी ही लक्षणे ओळखली, तर असे दुर्दैवी प्रसंग टाळता येतात.

हे संकेत दिसल्यास त्वरित लक्ष द्या:

  • मुलं एकाकी राहू लागणे.
  • ‘मी निरुपयोगी आहे’, ‘मला जगायचं नाही’ अशी निराशाजनक विधानं करणे.
  • झोप आणि भुकेमध्ये अचानक बदल होणे.
  • अभ्यास, खेळ किंवा छंदातला रस कमी होणे.
  • अशी लक्षणे दिसल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

जामखेड शहरातील डॉक्टरांनी, समुपदेशकांनी आणि सामाजिक संस्थांनी पुढे येऊन शाळांमध्ये ताण व्यवस्थापन कार्यशाळा आणि पालकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांच्या सवयींवर सजगपणे लक्ष द्यायला हवे. सोशल मीडियाच्या जमान्यात आई-बापाची पर्यायाने संपूर्ण कुटूंबाची जबाबदारी वाढली आहे. सोशल मीडियावर झळकणाऱ्या आयांनी स्वता:चा उथळपणा बाजूला सारत मुलांच्या उज्ज्वल भविष्यावर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे. हीच जबाबदारी बापाचीही आहे.

ही वेळ केवळ विचार करण्याची नाही, तर कृती करण्याची आहे. जामखेडमध्ये घडलेली घटना ही एक वेदनादायक आठवण आहे, जी आपल्याला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देते. संवाद, सुरक्षा, समुपदेशन आणि वेळेवर मदत – हे चार आधारस्तंभ मजबूत करूनच आपण आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू शकतो.पालक, शिक्षक, पोलीस आणि समाज म्हणून आपण सर्वजण एकत्र येऊन काम केले, तर लहान मुलांच्या आत्महत्यासारख्या दुर्दैवी घटना घडणार नाहीत.

तुम्हाला काय वाटतं, या समस्येवर आणखी काय उपाय करता येऊ शकतात? तुमचे विचार जामखेड टाइम्सच्या इन्स्टाग्राम पेजवर नक्की कळवा. हा लेख शेअर करून इतरांनाही जागरूक करा.