जामखेड : अहिल्यादेवींनी स्त्रियांच्या सन्मानासाठी व शिक्षणासाठी केलेले अतुलनीय कार्य आजही समाजासाठी मार्गदर्शक – प्रा राम शिंदे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संपूर्ण भारताच्या जनतेसाठी एक आदर्श शासक, न्यायप्रिय नेतृत्त्व आणि स्त्रीशक्तीचे प्रेरणास्थान होत्या. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी प्रशासनात पारदर्शकता, प्रजेबद्दलची माया आणि समाजातील सर्व घटकांचा विकास या तत्त्वांचा अंगीकार केला.स्त्रियांच्या सन्मानासाठी आणि शिक्षणासाठी त्यांनी जे कार्य केले ते आजही समाजासाठी मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २३० व्या पुण्यतिथीनिमित्त श्री क्षेत्र चोंडी, ता.जामखेड येथे स्मृती समारोह कार्यक्रमाचे आज १३ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमापूर्वी विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळास भेट देत अहिल्यादेवींना विनम्र अभिवादन केले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त, ६ मे रोजी राज्य शासनाच्या वतीने श्री क्षेत्र चोंडी येथे आयोजित विशेष मंत्रिमंडळ बैठकीत, श्री क्षेत्र चोंडी बृहत विकास आराखड्यासाठी ₹६८१.३२ कोटी तर पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमधून चोंडीला जोडणाऱ्या रस्त्यांच्या सुधारणा व उन्नतीसाठी ₹३६० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. असा एकूण ₹१०४१.३२ कोटींचा (₹६८१.३२ + ₹३६० ) भरीव निधी श्री क्षेत्र चोंडी बृहत विकास आराखड्यासाठी मंजूर उपलब्ध केल्याबद्दल सभापती प्रा.राम शिंदे यांनी आज पुन्हा एकदा राज्य शासनाचे आभार व्यक्त केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २३० व्या पुण्यतिथीनिमित्त जामखेड तालुक्यातील श्री क्षेत्र चोंडी येथे ग्रामस्थांच्या वतीने पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे हे सहकुटुंब सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्या मातोश्री भामाबाई शिंदे व सौभाग्यवती आशाताई शिंदे तसेच शिंदे कुटूंबातील इतर सहभागी झाले होते.

यावेळी पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, राजमाता अहिल्यादेवींनी देशातील अनेक मंदिरे, घाट, धर्मशाळा, पाणवठे यांचा जीर्णोद्धार व नूतनीकरण केले. देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांना व यात्रेकरूंना सुविधा मिळाव्यात म्हणून धर्मशाळा व पायाभूत सुविधा उभारल्या. धर्मरक्षण, स्त्रीशक्ती, न्यायप्रियता आणि लोककल्याण यांचे मूर्तिमंत उदाहरण घालून देणाऱ्या अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून समाजाला एकतेचा, प्रगतीचा आणि सेवाभावाचा मार्ग दाखवला. त्यांच्या जीवनकार्याची प्रेरणा आजही प्रत्येकाच्या मनात तेजोमय आहेत.

आदर्श राज्यकारभाराचे उदाहरण निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या संघर्षमय जीवनातून प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी, इतिहास आपल्याला मार्गदर्शन करतो. त्यातून प्रेरणा घेऊन अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य पुढे नेण्याचे बळ या निमित्ताने मिळेल, असा विश्वास यावेळी प्रा. शिंदे यांनी व्यक्त केला.

प्रा. राम शिंदे म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांचे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर भव्य राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी इच्छा होती. त्या अनुषंगाने चौंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेऊन ६८१ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. या निधीतून भव्य राष्ट्रीय स्मारक, अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची सचित्र माहिती देणारी विकासकामे करण्यात येणार आहेत. येत्या तीन वर्षांत ही कामे पूर्ण केली जातील. अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने चौंडी येथे सुत गिरणी उभारणीसाठी ११८ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून पुढील वर्षी हे काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष गिरणी सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मितीसाठीही शासनाने मान्यता दिली असून बहुभाषिक या चित्रपटाच्या निर्मितीसाठीच्या २१ कोटी रुपयांच्या पहिल्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली आहे. चौंडीकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांचा विकास २०७ कोटी रुपयांतून करण्यात येत असून वर्षभरात रस्त्यांची कामे पूर्ण होतील. कुकडीचे पाणी सीना नदीमध्ये आणून १५० कोटी रुपयांच्या बुडीत बंधाऱ्याद्वारे स्मारकाच्या परिसरात पाणी पोहोचवण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यास केवळ १६ महिन्यांत यश मिळाल्याचे सांगत, त्यांच्याच नावाने अहिल्यानगर येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही प्रा. शिंदे यांनी सांगितले.

आपल्या मंत्रीपदाच्या काळात १०० कोटी रुपयांत कृषी महाविद्यालय सुरू केले. अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शासनामार्फत साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी, माजी मंत्री तथा महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे संस्थापक डॉ.अण्णासाहेब डांगे, माजी आमदार रामहरी रुपणर, श्रीराम पुंडे,सुनिल वाघ, सुभाषराव सोनवणे, डॉ.अलकाताई गोडे, चिमणभाऊ डांगे, वासुदेवराव आसकर,अशोक देवकाते, डॉ.पांडुरंग टोपे, बाबासाहेब राणगे, संदीप कुले, सुभाष करे, नंदाताई शेळके, पुष्पाताई गुलवाडे, शांतिलाल नाना कोपनर, अविनाश शिंदे, पांडुरंग उबाळे,अभिमन्यु सोनवणे, डॉ.ज्ञानेश्वर झेंडे यांच्यासह आदी पदाधिकारी, व राज्यभरातून आलेले अहिल्यादेवींचे भक्त मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.
