जामखेड : प्रभाग अकरामध्ये मातोश्रींचा ऐतिहासिक विजय अन् सागरभाऊ टकले यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । जामखेड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या प्रभाग क्रमांक अकरामध्ये यंदा इतिहास घडला. बटेवाडी येथील रहिवासी असलेल्या भाजपच्या लोकप्रिय उमेदवार आशाबाई बापू टकले यांनी प्रस्थापितांना जोरदार धक्का दिला. टकले यांनी विरोधी उमेदवारांना अक्षरशा: ४४० व्होल्टचा झटका देत चारीमुंड्या चित केले आणि या निवडणुकीत खणखणीत विजय मिळवला. त्यांचा हा विजय जामखेड शहराच्या राजकारणात सर्वाधिक लक्षवेधी ठरला आहे. या निवडणुकीतून प्रभाग ११ मधील जनतेने युवा नेते सागरभाऊ टकले यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले.

जामखेड नगरपरिषदेची निवडणुक जाहीर होण्यापूर्वीच्या काही महिन्यांपासून सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष सागरभाऊ टकले यांनी राबवलेल्या नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रमांमुळे प्रभाग ११ जोरदार चर्चेत आला होता. सागरभाऊ टकले यांनी नगरपरिषद निवडणूकीत उमेदवारी करावी असा आग्रह जनतेकडून सुरु झाला होता. टकले हे जनतेचे उमेदवार म्हणून चर्चेत आले होते.

सागरभाऊ टकले यांच्या रूपाने तरूण तडफदार सामाजिक बांधिलकी जपणारा, वेळप्रसंगी निडरपणे कोणत्याही प्रसंगाला खमकेपणाने सामोरा जाणारा, लढवय्या कार्यकर्ता भाजपला उमेदवार म्हणून मिळणार असल्याने त्यांच्या उमेदवारीची दावेदारी प्रबळ झाली होती. ऐन निवडणुकीच्या काळात राजकीय समीकरणे बदलली आणि सागरभाऊ टकले यांच्याऐवजी त्यांच्या मातोश्री आशाबाई बापू टकले यांना पक्षाने उमेदवारी दिली. पक्षाचा आदेश सर्वतोपरी मानत सागरभाऊ टकले यांनी प्रभाग ११ मध्ये भाजपचा झेंडा फडकावण्यासाठी कंबर कसली आणि घवघवीत यश मिळवले.

आईच्या विजयासाठी सागरभाऊ टकले यांनी पक्षाने नेमलेल्या प्रभारींच्या मार्गदर्शनाखाली आणि समन्वयातून यशस्वी रणनिती आखली आणि ती प्रभावीपणे राबवली. प्रचार काळात जनतेशी थेट संवाद साधला. प्रभागातील प्रभावशाली तरूण आणि जेष्ठ कार्यकर्त्यांची मोट बांधत बेरजेचे राजकारण केले. आपल्या जीवलग सहकाऱ्यांच्या मदतीने प्रभागात प्रभावी प्रचार यंत्रणा राबवली आणि त्याचेच प्रतिबिंब विजयी निकालात अधोरेखित झाले.

सागरभाऊ टकले यांच्या मातोश्री आशाबाई बापु टकले ह्या प्रभाग ११ मध्ये सर्वसाधारण महिला मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यांचा सामना माजी नगरसेवकाच्या पत्नीसह अन्य एका तगड्या उमेदवाराविरोधात होता. या निवडणुकीत काट्याची टक्कर होणार, विजयी होणारा उमेदवार निसटते मताधिक्य घेणार, अश्या अफवांचे पिक निकालाआधी जोमात आले होते. वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला होता, परंतू या सर्व चर्चांना निकालातून उत्तर मिळाले.

भाजपच्या लोकप्रिय उमेदवार आशाबाई बापू टकले यांनी २४०८ मतांपैकी ११०० मते घेत दणदणीत विजय मिळवला. त्यांनी माजी नगरसेवक गणेश आजबे यांच्या पत्नी शाकुबाई आजबे यांचा ४४० तर राष्ट्रवादीच्या उमेदवार अपूर्वा अमोल गिरमे यांचा ५२२ मतांनी दारूण पराभव करत विजयाचा गुलाल उधळला.

प्रचारादरम्यान विरोधकांकडून अनेक आरोप-प्रत्यारोप झाले,मात्र टकले कुटुंबाने कोणत्याही वादात न अडकता थेट जनतेवर विश्वास ठेवला. जनतेची मने जिंकण्यावर भर दिला. जनतेनेही थेट मतपेटीतून उत्तर देत टकले कुटुंबाच्या विजयावर ऐतिहासिक शिक्कामोर्तब केले. सागरभाऊ टकले आणि त्यांच्या कुटुंबाचे जनतेशी असलेले अतूट आणि घट्ट नाते, या निवडणुकीच्या निकालातून स्पष्टपणे अधोरेखित झाले आहे. हा निकाल विरोधकांच्या बत्या गुल करणारा ठरला आहे.

आईच्या विजयाची घोषणा होताच, सागरभाऊ टकले यांनी आपले नेते प्रा. राम शिंदे साहेबांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत विजयोत्सव साजरा केला. त्यानंतर त्यांनी प्रभागातील जनतेच्या भेटी घेत आभार मानले आणि जनतेसोबत विजयोत्सव साजरा केला. रात्री उशिरा बटेवाडीतील जनतेसोबत टकले यांनी विजयोत्सव साजरा केला.

युवा उद्योजक सागर भाऊ टकले यांनी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण प्रभागात जबरदस्त माहौल तयार केला होता. तो मतदानापर्यंत कायम राहिला त्यामुळे भाजपला या प्रभागात घवघवीत यश मिळाले आहे. या निवडणुकीतून जनतेने सागरभाऊ टकले यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. टकले यांच्या रूपाने भाजपला दमदार युवा नेता मिळाला आहे. भाजपला याचा आगामी काळात मोठा राजकीय फायदा होणार हे मात्र निश्चित !