Independence Day 2025 : ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रत्येक गावात राबवली जाणार ‘हर घर तिरंगा हर घर स्वच्छता’ मोहिम, ८ ते १५ ऑगस्ट कालावधीत ‘स्वतंत्रता का उत्सव स्वच्छता के संग’ उपक्रम !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा , दि.७ ऑगस्ट २०२५ :Independence Day 2025 : सांस्कृतिक मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून देशभरात ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम आता राष्ट्रीय अभिमान व लोकसहभागाचा उत्सव ठरली आहे. यावर्षीच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता’ ही मोहीम ‘स्वतंत्रता का उत्सव, स्वच्छता के संग’ या टॅगलाइन अंतर्गत पेयजल व स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालय (नवी दिल्ली), सांस्कृतिक मंत्रालय व राज्य पाणी व स्वच्छता मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने ८ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती अ. नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी दिली.

‘स्वच्छ सुजल गाव’ प्रतिज्ञा घेतली जाणार
‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता’ या मोहिमेची संकल्पना लोकसहभागातून उत्सव व नागरी एकतेच्या भावनेवर आधारित असून स्वातंत्र्याची भावना स्वच्छता व सुजलतेशी जोडली आहे. पंतप्रधानांच्या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी ग्रामीण भागात स्वच्छ पाणीपुरवठा, शाश्वत स्वच्छता व आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी WaSH (पाणी, स्वच्छता व आरोग्य) या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा शुभारंभ ८ ऑगस्ट रोजी जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर करण्यात येणार असून ‘स्वच्छ सुजल गाव’ ही प्रतिज्ञा नागरिक व शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घेतली जाणार आहे.
Independence Day 2025 : ‘आझादी का श्रमदान’
९ ते ११ ऑगस्ट या कालावधीत सार्वजनिक स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून यामध्ये सार्वजनिक ठिकाणे, जलकुंभ, पाणी व स्वच्छता सुविधांची स्वच्छता केली जाणार आहे. गावातील विद्यार्थी व युवक यांच्या स्वच्छता रॅली, वैयक्तिक घरांमध्ये रांगोळी व रंगकाम, नाल्यांची स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, पाणीगळती शोधून ती थांबविणे, सार्वजनिक शौचालये, घनकचरा व्यवस्थापन केंद्रे, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन यामध्येही सहभाग घेण्यात येणार आहे. तसेच ‘आझादी का श्रमदान’ उपक्रमाअंतर्गत सार्वजनिक ठिकाणे व रस्त्यांची साफसफाई केली जाणार आहे.

१२ ऑगस्ट हा पायाभूत सुविधा स्वच्छता दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये जल जीवन मिशनअंतर्गत पाणी टाक्या, नळजोडण्या, पंप हाऊस इ. स्थळांची स्वच्छता व सजावट करण्यात येणार आहे. देशभक्तीपर थीमसह पाणी व स्वच्छता स्थळांचे रंगकाम व सजावट केली जाणार आहे. पायाभूत घटकांवर तिरंगी धागे बांधण्याचे कार्यक्रम होणार आहेत.
१३ ऑगस्ट रोजी स्वच्छता संवाद व जागरूकता दिन साजरा केला जाईल. यामध्ये कचरा व्यवस्थापन तांत्रिक प्रात्यक्षिके (वर्गीकरण, कंपोस्टिंग), शौचालय देखभाल, जलसंवर्धन, भूजल पुनर्भरण, जलस्रोत संरक्षण, एकल वापराचे प्लास्टिक टाळणे यासंदर्भात जनजागृती केली जाणार आहे. ग्रामस्थांच्या सहभागातून वैयक्तिक शौचालय स्वच्छता उपक्रमही राबविण्यात येणार आहे.
१४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाची तयारी म्हणून सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, चौक, बाजारपेठा व पाणी-स्वच्छता स्थळांची अंतिम स्वच्छता व सजावट केली जाईल. ध्वजारोहणासाठी ठिकाण निश्चित करून त्या परिसराची साफसफाई केली जाणार आहे.
१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येईल. यावेळी स्वच्छता वीर व स्वयंसेवकांचा सत्कार करण्यात येणार असून, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती व नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांनी केले आहे.