जामखेड : प्रत्येकाने विषमुक्त अन्नाचे सेवन करावे, तोच माझ्या जीवनातील सर्वोच्च पुरस्कार – बिजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : रासायनिक खते व हायब्रीड बियाण्यांच्या बेसुमार वापरामुळे आपल्या ताटात विषयुक्त अन्न येत आहे. त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होताना दिसत आहे. विषयुक्त अन्न संपूर्ण मानव जातीसाठी चिंतेचा विषय बनला आहे. सशक्त, बलवान व सुदृढ पिढी निर्माण करायची असेल तर विषमुक्त अन्नाचे सेवन करणे काळाची गरज बनली आहे. ज्या दिवशी मानव जातीला विषमुक्त अन्नाचा खरा लाभ मिळेल आणि ते आरोग्यदायी जीवन जगू शकेल, तोच माझ्या जीवनातील सर्वोच्च पुरस्कार असेल, असे अवाहन बिजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी बांधखडक येथे आयोजित व्याख्यानात बोलताना केले.

जामखेड तालुक्यातील बांधखडक येथील प्राथमिक शाळेत ७९ वा भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमातून साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी बिजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी कु. अक्षरा अमोल वारे या इ.५वीमधील विद्यार्थीनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यामुळे हा सोहळा खास ठरला.

यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांवरील डंबेल्स कवायत प्रकारांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले.त्यानंतर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, मिशन आरंभ, मंथन, बी. टी. एस, एक्सलंट ऑलिंपियाड इ.विविध स्पर्धा परीक्षांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा मानपत्र प्रदान करून शाळेतर्फे गौरव करण्यात आला.आदिनाथ वारे या विद्यार्थ्याने मानपत्राचे प्रभावी वाचन केले तर साईराज वारे या विद्यार्थ्याने पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या जीवनावर आधारित कवितेचे सादरीकरण केले.

स्वरा वारे, सिद्धी घोडके व संस्कृती वारे या विद्यार्थीनींनी प्रभावी भाषणे केली,तर सार्थक गिते(संत निवृत्तीनाथ), स्वप्निल फुंदे( संत ज्ञानेश्वर), रविराज वारे(संत सोपानदेव)व प्रतिष्ठा वारे(संत मुक्ताबाई) या विद्यार्थ्यांनी वेशभूषेसह प्रभावी सादरीकरण केले.

यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवराज पाटील,बांधखडकचे विद्यमान सरपंच राजेंद्र कुटे, उपसरपंच तानाजी फुंदे माजी सरपंच केशव वनवे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय वारे, उपाध्यक्ष जयकुमार वारे शिक्षणप्रेमी नागरिक बाबा वारे, अण्णासाहेब वारे, प्रभाकर वारे यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ, तरूण बांधव, महिला, पालक व आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंतीचे औचित्य साधून पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमानंतर प्रभावती वारे (आशा सेविका),संगीता वारे ( अंगणवाडी सेविका) सविता वारे (अंगणवाडी मदतनीस) अर्चना वारे (सी .आर.पी.महिला बचत गट) व ज्योती वारे (माजी ग्रामपंचायत सदस्या) यांच्या वतीने सर्वांना अन्नदान करण्यात आले.

सदरचा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक विकास सौने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आदर्श शिक्षक मनोहर इनामदार यांनी केले.
कोण आहेत राहीबाई पोपरे ?
पद्मश्री राहीबाई पोपेरे या बी.बी.सी.वर्ल्डने जाहीर करण्यात आलेल्या जगातील सर्वात प्रतिभावान व प्रेरणादायी अशा १००महिलांपैकी एक असून भारत सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाच्या नारीशक्ती तसेच पद्मश्री यांसारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. बीजमाता म्हणून त्या राज्यात प्रसिद्ध आहेत. देशीवाणाच्या संवर्धनासाठी त्या काम करतात.