जामखेड : खळबळजनक! नान्नजमध्ये दलित कुटुंबावर टोळक्याचा सशस्त्र हल्ला, प्राणघातक हल्ल्यात 7 जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर, 14 आरोपींवर गुन्हे दाखल
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील नान्नज गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.एका टोळक्याने दलित कुटुंबावर गज, काठ्या, तलवार व कोयत्यांनी सशस्त्र हल्ला करत मोठा धुमाकूळ घातला. या खळबळजनक घटनेत सात जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला १४ जणांविरोधात खुनाचा प्रयत्न करणे व अँट्रासिटीसह विविध कलमान्वे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेने जामखेड तालुक्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडवून दिली. ही घटना रविवारी घडली.

गावातील ‘आमची दहशत संपविण्याची भाषा करता, त्यापेक्षा आम्हीच तुम्हाला संपवतो’ असे आव्हान देत आरोपींनी फिर्यादी अभिजीत संपत साळवे व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला चढवला.फिर्यादीच्या भावाला मारहाण झाल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना आरोपींनी फिर्यादीची गाडी अडवून हत्यारांसह राडा घातला. गाडीच्या काचा फोडून, तलवार व कोयत्याने हल्ला करून रोख रक्कम व मोबाईल लुटले.टोळक्याच्या धुमाकूळामुळे नान्नज परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
नान्नज प्रकरणात १४ जणांविरोधात गुन्हे दाखल
- वैभव विजय साबळे,
- सार्थक विजय साबळे,
- अभय कृष्णाराजे भोसले,
- ओम चंद्रकांत गोरे,
- विजय शंकर साबळे,
- साईनाथ शंकर रजपूत,
- नरेंद्र शहाजी सोनवणे,
- कल्याण पांडुरंग मोहळकर,
- सोमनाथ काशिनाथ शिंगटे,
- (वरील सर्व रा नान्नज ता.जामखेड)
- निलेश ज्ञानदेव माने,
- किरण रावसाहेब जगदाळे,
- दोघे रा. महारूळी ता. जामखेड,
- हर्षद प्रताप काकडे रा. बोर्ले ता. जामखेड,
व इतर दोन अश्या एकुण १४ जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
नान्नज प्रकरणात सात जण जखमी
- फिर्यादी अभिजीत संपत साळवे,
- यशदिप संपत साळवे,
- आदर्श सुनील साळवे,
- दिग्विजय आबू सोनवणे,
- सद्दाम लतीफ पठाण,
- रतन साळवे
- रेषमा साळवे
नान्नज गावात घडलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेत वरील सात जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
नेमकी घटना काय ?
जामखेड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवार दि.२४ ऑगस्ट रोजी फिर्यादी अभिजित संपत साळवे हा घरी असताना त्यास त्याचा भाऊ यशदिप संपत साळवे याने फोन करून सांगितले की, नान्नज बाजार तळावर आरोपींनी भावास मारहाण करून जखमी केले आहे. हे समजताच फिर्यादी हा आपल्या नातेवाईकांसह घटनास्थळी आला. यावेळी जखमी भावास उपचारासाठी जामखेड येथील रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते.

परंतू जखमी यशदिप साळवे याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास पुढील उपचारासाठी नगर येथे घेऊन जायचे होते. त्यामुळे फिर्यादी हा आपल्या नातेवाईकांना घेऊन सद्दाम लतीफ पठाण यांच्या चारचाकी गाडीने जामखेडला जात असताना जखमी यशदिप साळवे यास मारहाण करणाऱ्या टोळक्याने फिर्यादीची गाडी अडवली आणि फिर्यादीच्या कुटुंबावर सशस्त्र हल्ला चढवला.
आमची दहशत संपविण्याची भाषा करता, त्यापेक्षा आम्हीच तुम्हाला मारून टाकतो, म्हणत टोळक्याचा नान्नजमध्ये धुमाकूळ
यावेळी या टोळक्याने गज, काठ्या, तलवार, कोयते हवेत फिरवत मोठा राडा घातला. त्यांनी फिर्याद जात असलेल्या गाडीच्या काचा फोडल्या तसेच गाडीतील नातेवाईकांना मारहाण केली. हा हल्ला करत असताना आरोपी वैभव साबळे फिर्यादीला म्हणाला की, तुम्ही काय आमची दहशत संपवता, तुम्ही गाव बंद करून, भाषणे करून आमची दहशत संपविण्याची भाषा करता, त्यापेक्षा आम्हीच तुम्हाला मारून टाकतो, असे म्हणत आरोपींनी फिर्यादीवर तलवार व कोयत्याने जोरदार हल्ला चढवत गंभीर जखमी केले.
नान्नजमध्ये गज, काठ्या, तलवारी, कोयत्यांचा नंगानाच
या घटनेत आरोपींनी 27 हजार रुपये रोख मोबाईल व गाडीची चावी घेऊन पोबारा केला. यावेळी आरोपींनी लोखंडी गज, काठ्या, तलवार, कोयते हवेत फिरवत आमच्या नादी लागलात तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही,अशी धमकी देत मोठयाने आरडा ओरडता करत सर्वजण मोटार सायकलवरून पसार झाले.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी भेट दिली. वरील घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे हे तपास करत आहेत.पोलीसांची तीन पथके आरोपींचा शोध घेत आहेत.
नान्नजमध्ये घडलेल्या घटनेमुळे नान्नज परिसरात मोठी दहशत पसरली आहे. नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. या प्रकरणातील आरोपींविरुद्ध जामखेड पोलिस काय कठोर कारवाई करतात याकडे जामखेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.
